नवी दिल्ली : आगामी लोकसभा आणि उत्तर प्रदेशसह विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपने आपली नवीन राष्ट्रीय टीम जाहीर केली आहे. त्यामध्ये खासदार विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणातून काहीशा बाजूला पडलेल्या स्मृती इराणी यांना पक्षात जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचसोबत राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांनाही पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी दिली आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाची बहुप्रतिक्षित नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. या नव्या चमूमध्ये आगामी राज्य विधानसभा निवडणुका आणि प्रादेशिक समतोल लक्षात घेऊन अनेक महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. या कार्यकारिणीत युवा आणि महिला नेतृत्वाला विशेष स्थान देण्यात आले असून जातीय समीकरणांचीही योग्य सांगड घातली गेली आहे. या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील नेत्यांनाही महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातून विनोद तावडे: पक्षाच्या राष्ट्रीय महामंत्री (सरचिटणीस) , डॉ. भारती प्रवीण पवार: राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती, पियूष गोयल: राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी, प्रीती गांधी: सोशल मीडिया सह-संयोजकपदी निवड करण्यात आली.
देशभरातील प्रमुख नेत्यांचा समावेश
पक्षाच्या नव्या संघटनाव्यचनेत देशातील इतर प्रमुख नेत्यांकडे महत्त्वाच्या जबाबदा-या सोपवण्यात आल्या आहेत. स्मृती इराणी (उत्तर प्रदेश): राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड, वसुंधरा राजे सिंधिया (राजस्थान): राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती, बी. एल. संतोष (दिल्ली): राष्ट्रीय महामंत्री (संघटन) पदी कायम , राजेश मंगल (राजस्थान) यांची राष्ट्रीय सह-कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजपच्या नव्या कार्यकारिणीत १३ उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय महामंत्री आणि १६ राष्ट्रीय मंत्री आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेशातून तब्बल ८ जणांना संधी देण्यात आली आहे. तर सोशल मीडियाचे संयोजक अमित मालविय यांचा डच्चू देण्यात आला असून त्या ठिकाणी दीपक मस्के यांची वर्णी लागली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशात होणा-या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील अनेक प्रमुख नेत्यांना या नव्या चमूमध्ये स्थान देण्यात आले आहे. या नव्या नियुक्तींमुळे भाजपच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
















