मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील वाळूघाट, कुंभमेळ्याच्या कामांमधील कथित गैरव्यवहार आणि मतदारयादीच्या प्रक्रियेवरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘कुंपणच शेत खातंय’ अशी टीका करत सरकारच्या काळात जनतेच्या घामाचा पैसा लुटला जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
भंडारा जिल्ह्यातील वाळूघाटांच्या व्यवहारावरून पटोले यांनी सरकारला जाब विचारला. वाळूच्या विषयावर भाजपचेच नेते बोलत असल्याचे सांगत त्यांनी या कथित हजारो कोटींच्या प्रकरणात कोणाला पाठबळ मिळत आहे, असा सवाल उपस्थित केला.
शासनच याला जबाबदार असते आणि शासनानेच यामध्ये भूमिका घ्यायची आहे, असे पटोले म्हणाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे स्वत: भंडा-याच्या शेजारील जिल्ह्यातील मंत्री असल्याने त्यांना या प्रकरणाची माहिती असल्याचा दावाही त्यांनी केला. भंडारा जिल्ह्यातील वाळूघाटांमध्ये नेमके काय घडले, याची संपूर्ण माहिती आपण महसूल मंर्त्यांना दिली असल्याचे पटोले यांनी सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणात कारवाई करण्याची जबाबदारी महसूल मंत्र्यांचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या कामांवरूनही नाना पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. कुंपणच शेत खातंय. जनतेच्या घामाचे पैसे कसे लुटले जातात, हे पाहायला मिळत आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. नकली किंवा संशयास्पद निविदा काढून त्यातून कामे दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्याची तिजोरी दिवसाढवळ्या लुटली जात असल्याचे चित्र असल्याचे पटोले म्हणाले. त्यांच्या मते, नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सरकारी निधी खर्च केला जात आहे. मात्र या पैशांचा योग्य वापर होण्याऐवजी त्यात कथित गैरव्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
















