धुळे : प्रतिनिधी
नाशिक-र्त्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर सरकारकडून हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात असताना, दुसरीकडे निधीअभावी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत, यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे
धुळे जिल्ह्यातील एका शाळेत ‘स्मार्ट क्लास’च्या उद्घाटन प्रसंगी न्यायमूर्ती वराळे बोलत होते. याच शाळेत त्यांनी शालेय शिक्षण घेतले होते. यावेळी त्यांनी शिक्षण व्यवस्थेची सद्य:स्थिती, मराठी भाषेचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांवर सविस्तर भाष्य केले.
न्यायमूर्ती वराळे म्हणाले, सरकार विविध विकासकामांसाठी आणि उपक्रमांसाठी भरघोस निधी दिल्याचे दावे करते. उपमुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्यासाठी ३२,००० कोटी रुपये तर मुख्यमंर्त्यांनी ३४,००० कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच एका कॉरिडॉर प्रकल्पासाठी ११,००० कोटी रुपये मंजूर झाल्याचे मी वाचले. सरकार हजारो कोटी रुपये खर्च करत आहे, याला माझा कोणताही आक्षेप नाही. मात्र, या हजारो कोटींपैकी केवळ ०.१ टक्के म्हणजे सुमारे ३२ कोटी रुपये जरी सरकारने शिक्षणासाठी दिले असते, तरी राज्यभरात बंद पडलेल्या १०० ते १२५ मराठी माध्यमाच्या शाळा नक्कीच वाचवता आल्या असत्या.
वाढत्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षणावरील तरतूद वाढवण्याऐवजी ती कमी केली जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. केंद्राच्या पातळीवर शिक्षणासाठीचे बजेट पूर्वी ८ ते १२टक्क्यांच्या आसपास असायचे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता यात वाढ होणे अपेक्षित होते, मात्र गेल्या अनेक वर्षांत हा आकडा १३ टक्क्यांपर्यंतही पोहोचू शकलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आश्रमशाळेतील मुलींच्या मृत्यूवर हळहळ
ग्रामीण भागातील शाळा आणि आश्रमशाळांमधील अपु-या मूलभूत सुविधांवर बोलताना न्यायमूर्ती वराळे यांनी एका अत्यंत दुर्दैवी घटनेचा संदर्भ दिला. ह्लएका निवासी आश्रमशाळेत योग्य सुविधा नसल्यामुळे विद्यार्थिनींना जमिनीवर झोपावे लागले. तिथे साप चावल्याने तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि एका मुलीवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे सांगत त्यांनी प्रशासनाने मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली.
मराठी माध्यमातील शिक्षणाचा अभिमान
यावेळी न्यायमूर्ती वराळे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. १० वी पर्यंतचे शिक्षण महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत झाल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. प्रादेशिक भाषेतून शिक्षण घेतल्याने माझ्या करिअरमध्ये कधीही अडथळा आला नाही, उलट माझा दृष्टिकोन अधिक समृद्ध झाला. मराठी भाषेने मला इतरांकडे पाहण्याचा एक मोकळा आणि व्यापक दृष्टिकोन दिला. माझ्या भाषेने मला बंधुभावाची शिकवण दिली,ह्व असे सांगत त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि कवी सुरेश भट यांच्या विचारांचा दाखला दिला.
















