अंतरवाली सराटी : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनात झोकून देणारे मनोज जरांगे पाटील यांनी शनिवार (२९ ऑगस्ट) सकाळी १० वाजल्यापासून बीड जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. या निमित्ताने शेकडो मराठा आंदोलन गावात दाखल झाले असून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपोषण सुरू करण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी आता विजयाच्या उंबरठ्यावर उभे असून मागे हटणार नाही, असे ठणकावून सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी १० आंदोलने केली होती. सरकार मागण्या मान्य करत असले तरी अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे संतप्त झालेले जरांगे पाटील यांनी पुन्हा आणि शेवटचे अस्त्र म्हणून उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने ५८ लाख नोंदी मान्य केल्या असल्या तरी त्यांना प्रमाणपत्रे दिलेली नाहीत. शिवाय प्रमाणपत्र दिल्यानंतर त्यांनी व्हॅलिडिटी करण्याची आग्रही मागणी केली. त्यामुळे आता माघार नाही. आरक्षणाची संपूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा निर्धार जरांगे पाटील यांनी केला आहे.
उपोषणाच्या सुरुवातीलाच जरांगे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे, आज गोडीने बोलतोय, उद्या बिघडू शकतो, असा इशाराही दिला. या निमित्ताने राज्यात ५८ लाख नोंदी सापडल्यात आता या सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ज्यांनी प्रमाणपत्र काढले त्यांना व्हॅलिडिटी द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.
या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजून घ्यावे, चर्चेसाठी आलात तर स्वागत नाहीतर लढा सुरूच राहणार असा इशारा देतानाच आता आमच्याकडून वेळ देणे शक्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर मराठ्यांनो आता गाफील राहू नका, घरात बसून राहू नका. मी अन्नपाण्यावाचून उपोषणाला बसलोय. तुम्ही तातडीने अंतरवाली सराटीला या आणि अंतिम लढ्यास सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले आहे. आता मराठा समाजाने सरकारवर विश्वास ठेवणे बंद करावे असे आवाहन करतानाच मराठा समाजाला मोठे होऊ न देण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप केला.
आता संघर्ष केला तर मराठ्यांच्या पुढच्या पिढीचा फायदा होईल, असे स्पष्ट करतानाच मनोज जरांगे पाटील यांनी बलिदान दिलेल्या मराठ्यांच्या कुटुंबाला नोकरी आणि मदत देण्याची मागणी केली. तसेच हे शेवटचे आंदोलन असून सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्यात आणि पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आणू नये, असे स्पष्ट केले. तसेच गाफिल राहिल्यास दगाफटका होऊ शकतो, याकडे लक्ष वेधले.
















