नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चार दिवसीय परदेश दौ-याला आजपासून (२९ ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत उझबेकिस्तान आणि किर्गिस्तानला या दोन देशांना भेट देणार आहेत. तसंच शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) २६ व्या शिखर परिषदेला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी किर्गिझ प्रजासत्ताकाची राजधानी बिश्केक इथं एससीओ शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान, आपल्या परदेश दौ-यावर निघण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, सुरक्षा, संपर्क आणि संधी यांवर आधारित असलेल्या एससीओ शिखर परिषदेसाठीच्या भारताच्या दृष्टिकोनाला पुढं नेण्यास आणि दहशतवादाच्या धोक्यापासून मुक्त प्रदेश उभारण्यासाठी सहकारी सदस्यांसोबत मिळून काम करण्यास ते उत्सुक आहेत. उझबेकिस्तान आणि किर्गिझ प्रजासत्ताक या दोन देशांच्या दौ-यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी असाही विश्वास व्यक्त केला की, या दौ-यामुळं मध्य आशियातील भारताची सामरिक भागीदारी अधिक मजबूत होईल. तसंच या प्रदेशासोबतचे सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील.
नरेंद्र मोदी म्हणाले की, ह्याा दौ-यामुळे शांतता, स्थैर्य आणि समृद्धीच्या आपल्या सामायिक ध्येयाला चालना मिळेल. हीच ती मूल्ये आहेत, जी जगासोबतच्या भारताच्या संबंधांच्या केंद्रस्थानी आहेत. याचबरोबर, भारत २०१७ पासून एससीओचा एक सक्रिय आणि रचनात्मक सदस्य राहिला आहे. मी या प्रदेशासाठी भारताच्या दूरदृष्टीला पुढं नेण्यास उत्सुक आहे. जी सुरक्षा, संपर्क आणि संधींवर आधारित आहे. तसंच, मला इतर सदस्यांसोबत मिळून दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकीपणाच्या दुष्कृत्यांपासून मुक्त प्रदेश घडवण्यासाठी काम करायचे आहे, जे आपल्या शेजारच्या प्रदेशात आणि त्यापलीकडेही शांतता आणि स्थिरतेला सतत धोका निर्माण करत आहेत.
















