नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक संशोधन विभागाने देशातील आर्थिक असमानतेवर अहवाल प्रकाशित केला आहे. उत्पन्नातील असमानतेत लक्षणीय घट झाल्याचे या संशोधनातून समोर आले.
भारतात प्रथमच एसबीआयने असमानता अंदाज मोजण्यासाठी आयकर डेटाचा वापर केला आहे. अहवालात म्हटले आहे की ३६.३ टक्के करदात्यांनी कमी उत्पन्न गटातून जास्त उत्पन्न गटात प्रवेश केला आहे.
एसबीआयच्या अहवालात असे म्हटले आहे की ग्रामीण अर्थव्यवस्थेतील उत्पन्न वाढल्यामुळे लोक आता दुचाकीऐवजी चारचाकी वाहनांचा पर्याय निवडत आहेत.
कोरोनानंतर तळाच्या ९० टक्के लोकांचा वापर ८.२ ट्रिलियन रुपयांनी वाढल्याचे सांगण्यात आले आहे. देशातील करदात्यांपैकी १५ टक्के महिला करदात्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
आयकर रिटर्न भरणा-या लोकांची आकडेवारी पाहिली तर ५ लाख ते १० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांची संख्या २९५ टक्क्यांनी वाढली आहे. उत्पन्न वाढल्याचा हा पुरावा आहे.
के आकाराचा अहवाल बनावट
स्टेट बॅँकेने अहवालात म्हटले आहे की, कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत के-आकाराच्या वाढीबद्दलचे दावे पक्षपाती आणि बनावट आहेत.
कोरोना महामारीनंतर भारतीय लोक आपली बचत रिअल इस्टेटमध्ये गुंतवत आहेत. के-आकाराच्या अर्थव्यवस्थेत, अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे भाग समान प्रमाणात वाढत नाहीत आणि दुर्बल घटक अधिक गरीब होतात.