बंगळूरू : आंतरधर्मीय जोडप्यातील एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर भाजपने कर्नाटकमधील सत्ताधा-यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यावर भाजपच्या सत्ताकाळात राज्यात महिलांविरोधात गुन्हे होतच नव्हते का? असा प्रतिप्रश्न कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी विचारला आहे.
आंतरधर्मीय संबंध ठेवल्यामुळे एका मुस्लिम महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना हावेरी येथे उघडकीस आली आहे. सात जणांनी हॉटेलच्या रुममध्ये घुसून जोडप्यावर हल्ला केला आणि तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार २६ वर्षीय पीडितेने केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनेनंतर कर्नाटक भाजपने सत्ताधारी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
कर्नाटकमध्ये यावरून रणकंदन माजले असताना आरोपींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्याच्या गृहमंर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. राज्यातील महिलांवरील गुन्ह्यांमध्ये होणा-या वाढीमुळे अराजकतेचेच प्रदर्शन घडवले आहे. पोलिसांची अजिबात भीडभाड न ठेवता गुन्हेगार कारवाया करत आहेत असा आरोप करत कर्नाटक भाजपने सत्ताधारी काँग्रेसवर टीका केली होती. याबाबत पत्रकारांनी गृहमंत्र्यांना विचारले असता, ‘राज्यात भाजपची सत्ता असताना गुन्हे घडत नव्हते का? याबाबत मी काय बोलणे अपेक्षित आहे? तेव्हा राज्य सुरक्षित होते का?,’असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.