नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंतरित अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. त्या म्हणाल्या की, महिला, मुलींच्या लसीकरणावर भर देण्यात आला आहे. गर्भाशय कॅन्सर लसीकरणासाठी ९ ते १४ वयोगटातील मुलींचे मोफत लसीकरण केले जात आहे. मुलांच्या संगोपनासाठी आणि गरोदर मातेसाठीच्या अनेक योजना एका छत्राखाली आणण्यात आल्या आहेत.
आयुष्यमान भारत योजनेचा लाभ आता सर्व आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे. ८० कोटी जनतेला मोफत राशन वाटप करण्यात येत आहे. महिलांची उद्योजगता २८ टक्क्यांनी वाढली आहे. लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. महिलांच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सीतारामन म्हणाल्या.
लखपती दीदी योजने अंतर्गत ८३ लाख छोट्या व्यवसायांतून ९ कोटी महिला ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावत आहेत. महिला सक्षमीकरण आणि आत्मनिर्भरपणा त्यामुळे शक्य झाले आहे. या योजनेमुळे १ कोटी महिला लखपती झाल्या आहेत. त्या दुस-यांसाठी प्रेरणा ठरत आहेत. त्यामुळे आता योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून ३ कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचे आता लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असे सीतारामन म्हणाल्या.
पीएम आवास योजनेतून ३ कोटी घरे बांधण्यात आली आहेत. ७० टक्के घरे पीएम आवास योजनेंतर्गत ग्रामीण महिलांना मिळाली आहेत. पुढच्या ५ वर्षांत २ कोटी घरे निर्माण करण्यात येतील. प्रत्येकाला घर मिळावे यासाठी मोदी सरकार प्रतिबद्ध आहे. किसान संपदा योजनेतून ३८ लाख शेतक-यांना फायदा झाला आहे. स्वयंरोजगारासाठी ३४ लाख कोटींचे कर्ज देण्यात आले आहे, असे त्या म्हणाल्या.