नवी दिल्ली : मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेली वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन देशात सुरू झाल्यानंतर तिची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. वंदे भारत ट्रेन देशातील विविध मार्गांवर धावते. महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते गांधीनगर दरम्यान सुरू झाली होती. जलद प्रवास आणि आरामदायी सुविधांमुळे वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवासी गर्दी करू लागले आहेत. मात्र, या ट्रेनवर दगडफेक करण्याच्या घटनाही वाढल्या आहेत.
वंदे भारत एक्स्प्रेसवर देशातील अनेक मार्गांवर काही समाजकंटकांकडून दगडफेक सुरू आहे. दगडफेक करून हल्लेखोर पळून जातात. आता काही लोकांनी चेन्नई-तिरुनेलवेली वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक केली आहे. चेन्नई एग्मोर स्थानकातून रविवारी रात्री १० वाजता ही ट्रेन निघाली असता, गंगाईकोंदन आणि नारीकीनारू स्टेशनमध्ये तिच्यावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमुळे वंदे भारतच्या सहा कोचचे नुकसान झाले आहे. यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणा-या प्रवाशांमध्ये दहशत पसरली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध घेत आहेत. यासाठी पोलिस स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. वंदे भारत ट्रेन ही नव्या भारताची ओळख म्हणून ओळखली जाते. मेक इन इंडिया अंतर्गत या रेल्वेची निर्मिती करण्यात आली आहे. या वर्षी वंदे भारत ट्रेनची संख्या वाढवण्यात येणार असून देशातील अनेक राज्यांतील विविध मार्गांवर धावणार आहेत. मात्र, वंदे भारतच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.