नवी दिल्ली : प्रगती मैदानमधील बोगद्यातील त्रुटींवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. देशात भ्रष्टाचा-यांचा अमृतकाल सुरू आहे अशा शब्दांत त्यांनी सरकारला लक्ष्य केले.
‘सुमारे ७७७ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला प्रगती मैदान बोगदा एका वर्षातच निरुपयोगी बनला आहे. पंतप्रधान मोदी प्रत्येक विकास प्रकल्पात ‘प्लॅनिंग’ऐवजी ‘मॉडेलिंग’ करीत आहेत आणि ‘ईडी’, ‘सीबीआय’ व ‘आयटी’ भ्रष्टाचाराऐवजी लोकशाहीविरुद्ध लढत आहेत,’ असे राहुल यांनी म्हटले आहे. त्यांनी बोगद्याचे छायाचित्रही ‘एक्स’वर पोस्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगती मैदान एकात्मिक ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाचा भाग असलेला १.३ किमी लांबीचा बोगदा आणि पाच अंडरपासचे १९ जून २०२२ रोजी उद्घाटन केले होते. मध्य दिल्ली आणि राजधानीचा पूर्वेकडील भाग; तसेच नोएडा (न्यू ओखला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी) व गाझियाबाद या शहरांतील दळणवळण वाढावे, या उद्देशाने हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.
५०० कोटींचा प्रतिदावा
दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) या प्रकल्पातील त्रुटींबाबत ‘लार्सन अँड टुब्रो’ (एलअँडटी) या बांधकाम कंपनीला नोटीस बजावली आहे; तसेच कंपनीकडून ५०० कोटी रुपयांची भरपाई मागून प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले. ‘एलअँडटी’ने ‘पीडब्ल्यूडी’विरुद्ध ५०० कोटींचा प्रतिदावा केला असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले.