बेनोनी : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा भारताला आयसीसी वर्ल्डकपमध्ये पराभवाचा धक्का दिला. १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा ७९ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी फायनल वनडे वर्ल्डकपची फायनल आणि आता १९ वर्षाखालील वर्ल्डकपच्या फायनलमध्ये देखील भारताला पराभूत केले. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच १९ वर्षाखालील वर्ल्डकप फायलनमध्ये भारताचा पराभव केला. याचबरोबर त्यांनी चौथ्यांदा १९ वर्षाखालील वर्ल्डकप जिंकला. भारताने २०१२ आणि २०१८ च्या १९ वर्षाखालील वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला मात दिली होती.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या २५४ धावांचे आव्हान पार करताना भारताचा संपूर्ण संघ १७४ धावात गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून बिअर्डमन आणि मॅकमिलनने भेदक मारा केला. या दोघांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. भारताकडून सलामीवीर आदर्श सिंगने सर्वाधिक ४७ धावा केल्या. मात्र, या धावा करण्यासाठी त्याने ७७ चेंडू घेतले. भारताकडून आदर्शव्यतिरिक्त फक्त तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. मुशीर खानने २२ तर मुर्गन अश्विनने ४२ धावा केल्या. नमन तिवारीने १३ धावांची खेळी करत मुर्गनला साथ देण्याचा प्रयत्न केला. बेअर्डमन आणि मॅकमिलन यांनी प्रत्येकी ३ तर वाईल्डरने २ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, १९ वर्षाखालील वर्ल्डकप २०२४ च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ५० षटकात ७ बाद २५३ धावा करत भारतासमोर मोठे आव्हान ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून हरजास सिंगने सर्वाधिक ५५ धावा केल्या. भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक ३ तर नयन तिवारीने २ विकेट्स घेतल्या. आतापर्यंत १९ वर्षाखालील वर्ल्डकप फायनलमध्ये २५३ धावांचे आव्हान कोणी पार केलेले नाही.