मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत सोमवार, २० मे रोजी मतदान होणार आहे. शनिवार, रविवारला जोडून मतदानाचा दिवस असल्याने तीन दिवस सलग सुट्ट्या मिळतात. त्याचा परिणाम मतदानावर होऊ नये, अशी चिंता विविध राजकीय पक्षांना लागली आहे. त्याचेच प्रतिबिंब माहीम विधानसभा मतदारसंघात येणा-या दादर येथे झालेल्या महायुतीच्या निर्धार मेळाव्यात उमटले.
ऐन उन्हाळा आणि सुट्ट्यांच्या कालावधीत यंदा मतदान आल्याने मतदार गावी गेल्यास मतदानाची टक्केवारी घटून त्याचा फटका बसू नये, याची काळजी घेण्याच्या सूचना महायुतीच्या निर्धार मेळाव्यात शिंदेसेनेचे मुंबई दक्षिण-मध्यचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
मतदानाची टक्केवारी वाढली की विजयाचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर द्या. नवमतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करा तसेच निवडणुकीवेळी मतदार गावी जाणार नाहीत यासाठी प्रयत्न करा, अशाही सूचना शेवाळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. यावेळी आमदार सदा सरवणकर, आमदार प्रसाद लाड, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, शिंदे सेनेचे विभागप्रमुख निशिकांत पाठारे यांच्यासह शिंदेसेना, भाजप, रिपाइं (आठवले गट) यांचे पदाधिकारी उपस्थित होते.