बीड : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे पोलिसांनी दाखल केलेला आरोप पत्रातून समोर आले आहे. अॅट्रॉसिटी, खंडणी आणि हत्या या तिन्ही घटनांचा एकत्रित उल्लेख आरोपपत्रातून करण्यात आला आहे. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. धनंजय मुंडे यांच्यासारखी माणसे राजकारणात असली तर अनेक वाल्मिक कराड तयार होतील असे त्यांनी म्हटले आहे. तर सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू असा जाहीर इशारा देखील त्यांनी दिला आहे.
अंजली दमानिया पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, आज चार्जशीट दाखल झालेली आहे. धनंजय मुंडे यांना कराडला वाचवायचे होते, यासाठी वेगवेगळे गुन्हे दाखल केले. ६ तारखेला जी मारामारी झाली, त्यानंतर सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांचे बोलणे झाले. धनंजय मुंडे यांच्यासारखी माणसे राजकारणात असली तर अनेक वाल्मिक कराड तयार होतील. १० वर्ष या सर्वांचे सिंडीकेट होते, असा आरोप त्यांनी केला.
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांना बडतर्फ करावे. वाल्मिक कराड हाच खरा यात सूत्रधार होता. सातपुडा येथे बैठक झालेली होती. बीडमध्ये १०७ अधिका-यांनी बदली करून घेतली. जर सोमवारपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू. धनंजय मुंडे यांचे अस्तित्व कराडमुळेच आहे. या प्रकरणात राजकीय दबाव होता. ते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्यानेच हे घडले, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
कराड मोठा होण्यामागे धनंजय मुंडेच
अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, दरम्यान, राज्यात राजकीय दहशत असावी तरी किती? हे यातून दिसून आले आहे. किंबहुना या प्रकरणात जर कोणी म्हणत असेल की यात मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग नव्हता, तर ते मी कधीही मान्य करणार नाही. वाल्मिक कराड आज मोठा होण्यामागचे कारण फक्त आणि फक्त धनंजय मुंडेच आहे. त्यांच्याशिवाय दुसरे-तिसरे कोणीही नाही, असे त्यांनी म्हटले.