जालना : बोगस दाखला देणारा अन् घेणारा गुन्हेगार आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ही गोष्ट सरकारने मान्य केलेली आहे. ज्याने चुकीच्या पद्धतीने दाखले काढलेले आहेत, त्याची पडताळणी करून राज्यासमोर ठेवू, असे सरकारने म्हटल्याची माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे प्राणांतिक उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. शुक्रवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीनंतर आणखी एक सरकारी शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना येऊन भेटणार आहे. छगन भुजबळ, गिरीश महाजन, अतुल सावे, उदय सामंत, धनंजय मुंडे, संदिपान भुमरे, गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे यांचा समावेश या शिष्टमंडळात आहे. या पार्श्वभूमीवर काल झालेल्या बैठकीत नेमकी कुठल्या विषयांवर चर्चा झाली? याबाबत गोपीचंद पडळकर यांनी माहिती दिली आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, काल राज्य सरकारच्या वतीने गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, संदिपान भुमरे आणि मी वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. तर छगन भुजबळ हे पुण्यातील मंगेश ससाणे यांच्याशी बोलत होते. काल भेट घेतल्यानंतर उपोषणकर्त्यांनी काही विषय सरकारसमोर मांडले.
२९ तारखेला सर्वपक्षीय बैठक
एकीकडे सरकारच्या वतीने सांगितले जात आहे की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. दुसरीकडे उपोषणकर्ते म्हणत आहेत की, ८० टक्के मराठा समाज हा आता ओबीसी झाला आहे. २० टक्के जो राहिला आहे त्याला आम्ही सगेसोयरेच्या माध्यमातून ओबीसी करणार आहोत. मग दोघांपैकी कोणीतरी एक खोटे बोलत आहे. याची स्पष्टता मराठा आणि ओबीसी समाजाला पाहिजे. सरकारने २९ तारखेला सर्वपक्षीय बैठक घेण्याचे मान्य केले आहे.