मुंबई : आगामी रणजी ट्रॉफीच्या नवीन हंगामातील पहिल्या दोन सामन्यांसाठी मुंबईने १५ खेळाडंूच्या संघाची घोषणा केली आहे. भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला यामध्ये स्थान मिळालेले नाही. तर अजिंक्य रहाणे सलग दुस-या सत्रात संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबई ५ जानेवारीला बिहारविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल, त्यानंतर १२ ते १५ जानेवारीला आंध्र प्रदेशशी सामना होईल.
अनुभवी अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरही मुंबई संघात सामील होऊ शकतो. सध्या तो भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिकेत आहे. भारत दौरा संपल्यानंतर तो मुंबईसाठी रणजी ट्रॉफी खेळू शकतो. याशिवाय सलामीवीर पृथ्वी शॉही पहिल्या दोन सामन्यांनंतर संघाचा भाग होणार आहे. दुखापतीमुळे शॉ अनेक महिने क्रिकेटपासून दूर होता.
इतर खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, सरफराज खानचाही संघात समावेश करण्यात आला आहे. सरफराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली असून मुंबईच्या यशात त्याचा मोलाचा वाटा आहे.
यावेळीही रणजी ट्रॉफीमध्ये जास्तीत जास्त धावा करून भारतीय संघासाठी दावा ठोकण्याचा सर्फराजचा प्रयत्न असेल. भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर अजिंक्य रहाणे कशी कामगिरी करतो याकडे सर्वांच्या नजरा असतील.