बीड : बीड लोकसभेची लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होत आहे. एका बाजूने मोठमोठे पुढारी तर दुस-या बाजूने सामान्यांचा जनाधार आहे. सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत असल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय निश्चित आहे. यावेळी बीडचा खासदार आणि दिल्लीचे सरकार दोन्हीही सेक्युलर असतील, असा विश्वास पक्षाचे जिल्हाध्यक्ष व आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
सर्व जाती धर्मांना, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याच्या जेष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारामुळे सर्वच घटकांतून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे संदीप क्षीरसागर म्हणाले. सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी व विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांची संदीप क्षीरसागर यांनी बैठक घेतली.
हिंदू – मुस्लीम वाद भडकवून आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेणा-या विचारसरणीचा आता शेवट असणार आहे. जाती – जातींमध्ये भांडण लावून घाणेरडे राजकारण करण्याची संधी आता जनशक्ती देणार नाही. एका बाजूने सर्व सत्ता एकवटली असून दुस-या बाजूने सामान्यांचे लोंढे दिसत आहेत. मात्र, यंदा सर्वत्र परिवर्तनाचे वारे दिसत आहे, असे क्षीरसागर म्हणाले.
जिल्ह्यातील सर्वच घटक नेहमीच्या फसवणूकीला ओळखून चुकले आहेत. त्यामुळे बीडचा खासदार बजरंग सोनवणेंच्या रुपाने सेक्युलर विचाराचा असेल तसेच दिल्लीमध्ये सरकार देखील याच विचाराचे असेल, असा विश्वासही संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला. माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सुनील धांडे उपस्थित होते.