कळंब : सतीश टोणगे
बीड जिल्ह्यातील राजकारण पूर्वीपासूनच राज्याने पाहिले आहे. किळसवाण्या राजकारणाची सुरुवात येथूनच झाली. जादूची कांडी फिरविणारी जोडी म्हणजे दिवंगत गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांनी राजकारणाला नेहमीच कलाटणी दिली. या जिल्ह्यात मुंडे, क्षीरसागर, आडसकर या घराण्याचा बोलबाला राहिला आहे. हाबाडा फेम म्हणून वेगळी ओळख निर्माण केलेले दिवंगत आ. बाबुराव आडसकर, कणखर महिला म्हणून ओळखल्या जाणा-या केशर काकू क्षीरसागर आजही त्यांच्या कामाने राज्यभर ओळखल्या जातात.
या जिल्ह्यातील राजकारणाचे पडसाद राज्य भर पडतात. दिवंगत उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे राजकारण जिल्ह्या पुरते मर्यादित न राहता, राज्य भर समर्थक निर्माण केले होते. आदर्श नेता, मित्र म्हणून त्यांच्याकडे व तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. याच जिल्ह्यातून काका पुतण्याच्या संघर्षाला सुरुवात झाली. या नंतर लातूर वगळता प्रत्येक ठिकाणी काका पुतण्याचा संघर्ष, राजकीय कुरघोड्या, धुसफूस, पहायला मिळत आहे. क्षीरसागर घराण्याची ओळखच काकू मुळे झाली पण ती त्यांच्या वारसदाराना टिकवता आली नसल्याची कुजबूज होत आहे. घरातही काका पुतण्या संघर्ष बघायला मिळत आहे. तिसरे आडसकर घराणे, दिवंगत आ. बाबुराव आडसकर यांचा हाबाडा राज्याने पहिला, तेंव्हापासूनच राजकारणात हाबाडा हा शब्द प्रचलित झाला आहे.
मुंडे घराण्याच्या वारसदार म्हणून पंकजांना गोपीनाथ मुंडेंचा गोतावळा टिकवता आला नाही. इतर पक्षाच्या नेत्याने बंधू धनुभाऊला बळ दिल्याने, ताईना अडचणीत आणले. बहीण भावातील राजकारणाने कळस केला होता. आडसकर घराण्या तील वारसदाराना संधी मिळाली नाही. दिवंगत आ. विमलताई मुंदडा यांची पकड चांगली होती, त्यांच्या निधनानंतर, सूनबाईला संधी मिळाली पण ,विमल ताई चे हाडाचे कार्यकर्ते सांभाळण्यात अपयश आले……जिल्ह्याने अनेक आमदार केले पण राजकरणात छाप पाडू शकले नसल्याची कुजबूज होऊ लागली आहे. विधानसभेत एकमेव, धोतरवाला आमदार म्हणून मधुकरराव चव्हाण यांची ओळख आहे, त्यांची बोली भाषा रांगडी असल्याने प्रशासनावर वचक होता. बीड जिल्ह्यात पक्षा पेक्षा नेत्यावर निष्ठा असते पण गटातटाचे, जाती पातीचे राजकारण किळसवाणे आहे. या मुळेच लहान मोठ्या निवडणुकीत मतदार जसे जमेल तसे, हाबाडा देऊ लागले आहेत. काका पुतण्याच्या लढाईचे उगमस्थान बीड असल्याने याची कीड राज्यभर पसरली असल्याने इतर निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार या वर मतदार नेहमीच कुजबूज करतात…