25.6 C
Latur
Wednesday, July 3, 2024
Homeमहाराष्ट्रअधिवेशन संपण्यापूर्वी राज्यातही येणार पेपरफुटीचा कायदा

अधिवेशन संपण्यापूर्वी राज्यातही येणार पेपरफुटीचा कायदा

मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. राज्यामध्ये पेपरफुटीच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत, त्यावरुन सभागृहात विरोधकांनी आवाज उठवला. शिवाय परीक्षेसाठी लागणारी मोठी फीस, नॉर्मलायझेशन यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले.

पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी राज्याचा पेपर फुटीचा कायदा आणणार, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सभागृहात केली. सुरुवातीला मुद्दा मांडताना रोहित पवार म्हणाले की, पेपर फुटीबाबत सरकार कायदा करणार आहे का? केंद्राचा कायदा आला त्यांचे कौतुक आहे तसा कायदा इथंही आणावा लागेल.

रोहित पवारांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, तलाठी परीक्षेत उत्तर चुकले होते, तिथं घोटाळा झाला नाही. पण आम्ही १ लाख लोकांना पारदर्शी रोजगार दिला आहे. पेपरफुटीचा नरेटिव्ह सेट केला जात आहे, आम्ही एक लाख लोकांना रोजगार दिला हा रेकॉर्ड आहे. पेपरफुटीबाबत कायदा करण्यासाठी आमचा मनोदय आहे, याच अधिवेशनात हा कायदा आणला जाईल, असे फडणवीस म्हणाले.

पदभरतीच्या संदर्भातने बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, आपण म्हणता पेपरफुटी पूर्वीच्या सरकारच्या काळात झाली, पण २०२२-२३ मध्ये अनेक भरतींचा पेपर फुटला, मग त्याला जबाबदार कोण? पेपरफुटी ही कीड आहे ती थांबवली पाहिजे. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले, भास्कर जाधव फेक नरेटिव्ह दाखवत आहेत. युवांमध्ये असंतोष कसा होईल यासाठी फेक नरेटिव्ह केले जात आहे, पुण्यात एक वेबसाईट आहे ती हे पसरवण्याचे काम करते आहे. ती आता एका व्यक्तीने टेकओव्हर केली आहे, मी गृहमंत्री आहे, सर्व गोष्टी माहिती असतात. शांत स्वभाव आहे म्हणून बोलत नाही असे नाही असे फडणवीस म्हणाले.

अद्याप अडिच लाख पदे रिक्त : देशमुख
तुम्ही म्हणता भरती झाली पण अजून जवळपास अडीच लाख पदे रिक्त आहेत. सरकारमध्ये अजून ३३ टक्के पदे रिक्त आहेत. गृहविभागात ५७ हजार पदे रिक्त असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिल्यानंतर देशमुखांना फडणवीसांनी उत्तर देताना पदभरती तुम्हीच रोखली होती, २००५ नंतर भरतीवर रोख आली होती असे फडणवीस म्हणाले. आपण मुख्यमंत्री असताना भरती सुरु केली, आपण अजून पदं भरणार असल्याचे ते म्हणाले. २ वर्षात आम्ही १ लाख पदे भरली आहेत. तुम्ही नोकरभरती बंद केली पण आम्ही सुरू केली. जेवढे मागे जावू तेवढे तुम्ही उघडे पडाल. आम्ही पदे भरणार, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR