40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रविधानसभा, मनपांसाठी भाजपची मतदारसंघाच्या खांद्यावर बंदूक

विधानसभा, मनपांसाठी भाजपची मतदारसंघाच्या खांद्यावर बंदूक

कल्याण-ठाणे लोकसभा मतदार संघ

नवी मुंबई : राज्यात सर्वांधिक नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरण असलेला ठाणे जिल्हा आहे. सहा महापालिका, दोन नगरपालिका, दोन नगरपंचायती असलेल्या या जिल्ह्यात केंद्र, राज्य सरकार, एमएमआरडीए, महापालिकांचे अब्जावधींचे प्रकल्प सुरू आहेत. असे असताना या जिल्ह्यात भाजपला शत-प्रतिशत सत्ता मिळविता आलेली नाही. लोकसभेच्या निमित्ताने ठाणे किंवा कल्याण एक मतदारसंघ भाजपला हवा आहे. हे केवळ लोकसभेपुरते मर्यादित नाही. तर जिल्ह्यातील १८ विधानसभा आणि सहा महापालिकांची सत्ता काबीज करण्यासाठी ताणलेली बंदूक आहे.

एकेकाळी रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्यासारख्या दिग्गजांनी पूर्वीच्या एकसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. नंतरच्या काळात शिवसेनेच्या आनंद दिघे यांनी कौशल्याच्या बळावर ठाण्याचा गड सर केला. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत कल्याण आणि भिवंडी हे मतदारसंघ निर्माण झाले. परंतु, येथे भिवंडीवगळता दोन्हीकडे शिवसेना सरस ठरली आहे. विशेषत: ठाणे शहरात पक्षाची ताकद कमी आहे. मात्र, याच मतदारसंघातील मीरा – भाईंदर महापालिका आणि नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या बळावर भाजपची सत्ता आहे. मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईत भाजपचेच आमदार आहेत. यामुळे या खेपेला ठाण्याचा खासदार भाजपचाच असावा, असा आग्रह त्या पक्षाच्या श्रेष्ठींचा आहे.

ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचे आहेत. त्यांचा कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो. ठाण्यात भाजपचे संजय केळकर आमदार आहेत, तर मीरा – भाईदरमध्ये गीता जैन, नवी मुंबईतील ऐरोलीत गणेश नाईक आणि बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे आमदार आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे, तर कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत खासदार आहेत. येथील विधानसभांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. तरीही कल्याण-डोंबिवलीत भाजपला स्वबळावर महापालिका काबीज करता आलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR