मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी सन्मान २०१९ च्या योजनेतील लाभार्थी शेतक-यांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली होती. या निर्णयावर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे १३ लाख शेतक-यांना लाभ मिळणार आहे. याशिवाय सन २०२६-२७ मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने २३ लाख शेतक-यांनाही प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तवावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी २०१९ च्या योजनेतील लाभार्थी शेतक-यांना ५० हजार ऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या निकष सुधारणेमुळे २०१९ च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे १३ लाख शेतक-यांसाठीची ५० हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून त्यांना नियमित कर्जमाफी मिळणार आहे. तर सन २०२६-२७ मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने २३ लाख शेतक-यांनाही प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. राज्यातील ५६ लाख शेतक-यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ सरकारने यापूर्वीच जाहीर केली आहे.
















