मुंबई : प्रतिनिधी
पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील दापचरी येथे ५५८.४३ हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या निर्णयाची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार प्रकल्प महाराष्ट्रातील शेतक-यांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरेल असा विश्वास रावल यांनी यावेळी व्यक्त केला.
वाढवण बंदरापासून अवघ्या ४० किमी अंतरावर उभारण्यात येणारा हा प्रकल्प फ्रान्समधील रुंगीस मार्केट, नेदरलँड्समधील रॉयल फ्लोरा हॉलंड तसेच रॉटरडॅम बंदर परिसरातील आधुनिक कृषी लॉजिस्टिक व्यवस्थेच्या धर्तीवर विकसित करण्यात येणार आहे. देशांतर्गत तसेच निर्यात बाजारपेठांच्या गरजा पूर्ण करणारे जागतिक दर्जाचे कृषी व्यापार केंद्र म्हणून त्याची उभारणी केली जाईल, असे रावल यांनी सांगितले. राज्यात आंतरराष्ट्रीय बाजार, राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती अशी त्रिस्तरीय विपणन व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन असून त्यातून कृषी मालाच्या मूल्यसाखळीला बळकटी मिळणार आहे. निर्यात बाजार सुविधांचे एकत्रीकरण, काढणीनंतरचे मूल्यवर्धन, संगणकीकृत तसेच पारदर्शक व्यवहार आणि आधुनिक बाजार पायाभूत सुविधा यावर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती रावल यांनी दिली.
एकाच केंद्रात ६ महत्त्वाच्या सुविधा
दापचरी येथील केंद्रामध्ये घाऊक व्यापार, आयात-निर्यात सुविधा, शीतसाखळी व्यवस्था, ग्रेडिंग आणि पॅकेजिंग, मल्टिमोडल लॉजिस्टिक व्यवस्था तसेच अॅग्रीटेक आणि एक्स्चेंज सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय वेअरहाऊसिंग, कोल्ड स्टोरेज, रिपनिंग चेंबर्स, गुणवत्ता परीक्षण सुविधा, कंटेनर टर्मिनल, रेल्वे सायडिंग, ई-लिलाव व्यवस्था आणि निर्यात सुलभता केंद्र उभारण्याचे नियोजन असल्याचे रावल म्हणाले.
















