नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक तणावादरम्यान आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि क्रीडा जगताला हादरवून सोडणारा खळबळजनक दावा समोर आला आहे. भारताच्या गृह मंत्रालयाचे माजी अंडर सेक्रेटरी आरव्हीएस मणी यांनी थेट पाकिस्तानी क्रिकेट संघालाच ड्रग्ज तस्कर घोषित केले आहे.
शोएब अख्तर आणि मोहम्मद आसिफ यांसारखे स्टार क्रिकेटपटू जेव्हा जेव्हा भारत दौ-यावर यायचे, तेव्हा ते स्वत:सोबत ड्रग्जचा मोठा साठा घेऊन यायचे आणि या संपूर्ण काळ्या धंद्यामागे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचा हात होता, असा खळबळजनक आरोप मणी यांनी केला आहे.
आरव्हीएस मणी हे २००६ ते २०१० या काळात गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा विभागात कार्यरत होते आणि त्यांच्याकडे जम्मू-काश्मीरसह दहशतवादाशी संबंधित अत्यंत संवेदनशील फाईल्सची जबाबदारी होती.
शोएब अख्तर आणि आसिफची हाय कमिशनरसमोर कबुली
मंत्रालयातील आपल्या कार्यकाळातील एका गुप्त अहवालाचा हवाला देत आरव्हीएस मणी म्हणाले, क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि मोहम्मद आसिफ यांनी स्वत: पाकिस्तानी हाय कमिशनरसमोर कबुली दिली होती की ते भारतात ड्रग्ज घेऊन आले आहेत. हा प्रकार उघड होताच त्यांना तातडीने मायदेशी रवाना करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानची कोणतीही टीम किंवा डेलिगेशन भारतात येत असे, तेव्हा ते वैयक्तिक वापरासाठी नाही तर व्यावसायिक हेतूने ड्रग्जची तस्करी करायचे. ही घटना घडल्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत म्हणजेच मार्च २००७ मध्ये वेस्ट इंडिजमधील वर्ल्ड कप दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचे इंग्लिश प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा हॉटेलच्या खोलीत संशयास्पद मृत्यू झाला. वूल्मर हे पाकिस्तानी खेळाडूंच्या या ड्रग्ज नेटवर्कचा तीव्र विरोध करत होते, म्हणूनच त्यांची कट रचून हत्या करण्यात आली, असा संशय मणी यांनी व्यक्त केला आहे.
भारतातील दहशतवादी हल्ल्यांचे कनेक्शन
मणी यांनी थेट सांगितले की, भारतात ड्रग्ज पाठवणे ही पाकिस्तानची अधिकृत सरकारी नीती आहे. तत्कालीन संरक्षण गुप्तहेर संस्थेच्या अहवालानुसार, भारतात होणा-या एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी ३० टक्के हल्ल्यांचा पैसा हा याच ड्रग्जच्या काळ्या बाजारातून गोळा केला जायचा.
मंत्रालयातील अंतर्गत गणिते
मणी यांनी सुरक्षा यंत्रणांच्या कामाचे गुपित सांगताना म्हटले आम्ही गृह मंत्रालयात असताना एक वेगळेच गणित मांडायचो. जर अफगाणिस्तानच्या जलालाबाद प्रांतात अफीमचे पीक प्रचंड आले, तर आम्ही सतर्क व्हायचो; कारण त्याचा थेट अर्थ असा असायचा की आता भारतात दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढणार आहे. तिथल्या पिकावरून आम्ही भारतातील धोक्याचा अंदाज लावायचो.
















