35 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रराज्य विधान परिषदेच्या ११ जागांचे चॉकलेट

राज्य विधान परिषदेच्या ११ जागांचे चॉकलेट

लोकसभेला मदत करा, आमदारकीची संधी मिळवा! बड्या नेत्यांची ऑफर

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी येत्या जूनमध्ये निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत विविध मतदारसंघांमध्ये राजकीय तडजोडींचा भाग म्हणून बड्या नेतेमंडळींकडून अनेकांना विधान परिषदेचे चॉकलेट दाखविले जात आहे.

लोकसभेला आम्हाला मदत करा, विधान परिषदेत संधी देऊ, असे आश्वासन दिले जात आहे. एखाद्या नेत्याला विधानसभेत ‘अ‍ॅडजेस्ट’ करणे राजकीय परिस्थितीमुळे शक्य नसेल तर त्याला विधान परिषदेचे आश्वासन दिले जात आहे.

विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या ७८ इतकी आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागा अद्याप भरलेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर पाठवावयाच्या ९ जागा आधीपासूनच रिक्त आहेत. आणखी १० जागा लवकरच रिक्त होणार आहेत. या १० जागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून गेलेले आमदार आणि शिक्षक व पदवीधर मतदारसंघांतून निवडून गेलेल्या आमदारांचा समावेश आहे.

काही ठिकाणी संभाव्य बंड थंड करण्यासाठी, काही ठिकाणी ४०-५० हजार मतांची ताकद राखणा-या नेत्याला आपल्या जवळ ठेवण्यासाठी ‘जूनमध्ये विधान परिषदेची निवडणूक आहे, तिथे तुम्हाला संधी देऊ’ असा परस्पर सामंजस्य करार केला जात आहे. ११ आमदारांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत २७ जुलैला संपणार आहे. साधारणत: मुदत संपण्याच्या एक महिना आधी ही निवडणूक होते. हे लक्षात घेता जूनअखेर ११ जागांची निवडणूक होईल. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागेल, त्यानंतर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १० जूनपासून सुरू होईल. या अधिवेशन काळात किंवा संपल्यानंतर विधान परिषदेची निवडणूक होईल. आमदारकीचा शब्द ज्यांना दिला, त्यांना खरेच संधी दिली तर सध्याच्या ११ आमदारांपैकी काहींना पुन्हा संधी नाकारली जाऊ शकते.

यावेळी काही आमदार लोकसभा निवडणूक लढत आहेत. त्यातील ज्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि तो विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला आहे असे जर लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले तर ते कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसतील. मात्र, लोकसभा लढत असलेल्या बहुतांश आमदारांनी पदाचा राजीनामा दिलेला नाही. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे, ते आता राज्यसभेचे सदस्य आहेत. गोवर्धन शर्मा, अनिल बाबर व राजेंद्र पाटणी या विधानसभा सदस्यांचे निधन झालेले आहे. हे लक्षात घेऊन मतांचा कोटा ठरेल.

११ आमदारांची मुदत २७ जुलैला संपणार
बाबा दुर्राणी (अजित पवार गट), वजाहत मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), मनीषा कायंदे (शिंदेसेना), अनिल परब (उद्धवसेना), भाई गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), जयंत पाटील (शेकाप) आणि महादेव जानकर (रासप).

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR