वायनाड : लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी पार पडणार आहे. केरळमधील लोकसभेच्या २० जागांवर एकाच टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मतदारसंघ वायनाडमध्ये संशयित सशस्त्र माओवाद्यांच्या चार सदस्यीय गटाने बुधवारी लोकांना लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.
यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना थलप्पुझा पोलिस ठाण्यांतर्गत येणा-या कंबामाला परिसरात घडली.पोलिस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, या भागात माओवादी आले असून, ते लोकांना मतदान न करण्यासाठी आवाहन करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांना तात्काळ कंबामाला येथे पाठवण्यात आले.
स्थानिक लोकांनी पोलिसांना सांगितले की, सकाळी ६.१५ वाजता माओवादी आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही केले. माओवादी त्यांच्या गणवेशात होते आणि त्यांच्याकडे बंदुकाही होत्या. सुमारे २० मिनिटे ते या परिसरात थांबले होते, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मात्र, नंतर माओवाद्यांचा एक व्हीडीओही व्हायरल झाला आहे., ज्यामध्ये ते स्थानिक लोकांशी बोलताना दिसत होते. व्हीडीओनुसार, माओवादी जेव्हा परिसरात पोहोचले तेव्हा तेथे अनेक नागरिक उपस्थित असलेले दिसत आहेत.
उद्योगपती मित्रांसाठी मोदींनी देशाचा केला लिलाव-आप खासदार संजय सिंह यांचा दावा
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदींना देशाची नाही तर मित्रांची चिंता आहे, आपल्या मित्रांसाठी ते देशाचा लिलाव करत आहेत, असा आरोप खासदार संजय सिंह यांनी केला आहे. इंडिया आघाडी याविरोधात लढत असून, आम्ही मोदींच्या धोरणाविरोधात आवाज उठवू, असेही सिंह म्हणाले.
संजय सिंह म्हणाले की, २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पेक्ट्रम वितरणातील फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह धोरण रद्द केले होते. भाजप आणि नरेंद्र मोदी यांनीही या धोरणाला प्रत्येक गल्ली आणि परिसरात विरोध केला होता. आता हे धोरण पुन्हा लागू करण्यासाठी भाजप सरकारने न्यायालयात धाव घेतली आहे. यातून त्यांना आपल्या काही भांडवलदार मित्रांचा फायदा करून घ्यायचा आहे.
नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार देशासाठी नाही तर त्यांच्या मित्रांसाठी काम करत आहे, असा आरोप त्यांनी पंतप्रधान मोदींवर केला. देशाची संपत्ती ते त्यांच्या मित्रांच्या ताब्यात देत आहेत. नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार ५ जी घोटाळा करत असून हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा आहे. सरकारने ठराविक उद्योगपतींचे लाखो आणि करोडो रुपयांचे कर्ज माफ करून केंद्र सरकार संपूर्ण देश विकत आहे, असा दावाही खासदार सिंह यांनी केला.