मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांना आता तंदूर रोटी बनवण्यासाठी तंदूर कोळसा भट्टी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने तंदूर कोळसा भट्टींवर बंदी घातल्याने तंदूर रोटी मिळणार नाही, असे होणार नाही. मुंबई महापालिकेने कोळसा भट्टीऐवजी इलेक्ट्रिकल उपकरणे, सीएनजी, पीएनजी, एलपीजी इंधनाचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबई हायकोर्टानेच याबाबत आदेश दिले.
हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेकडून याबाबत कारवाई केली जात आहे.
महापालिकेने सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि ढाब्यांना रितसर नोटीस पाठवत आदेश दिले आहे. महापालिकेच्या या कारवाईवर काही हॉटेल मालकांनी नाराजी व्यक्त केली. कोळसा भट्टी बंद केल्याने तंदूर रोटीच्या चवीत बदल होईल, असे काहीचे म्हणणे आहे, असे असले तरी कोर्टाच्या आदेशानुसार आता तंदूर कोळसा भट्टी वापरण्यास मज्जाव असणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेकडून कोळसा आणि लाकडी ओवनवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई महापालिकेने कोळसा तंदूर भट्टी वापरणारे रेस्टॉरंट, हॉटेल्सला आणि ढाब्यांना नोटीस बजावली. किचनमध्ये कोळसा भट्टीऐवजी इलेक्ट्रिकल उपकरणे, सीएनजी, पीएनजी, एलपीजी इंधनाचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यामुळे आता मुंबईकरांना कोळसा तंदूर भट्टीवरील तंदूर रोटी खाण्याचा आनंद घेता येणार नाही.
७ जुलैपर्यंत इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करा
मुंबई महापालिकांनी हॉटेल चालकांना ७ जुलैपर्यंत कोळसा तंदूर भट्टींना इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये बदलण्याची सूचना केली. या निर्णयाचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात परवाना रद्द करण्यापर्यंत कारवाई केली जाण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे हॉटेल मालकांना मुंबई महापालिकेचे आदेश पाळण्याशिवाय पर्याय नाही.