देहू : प्रतिनिधी
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, ७ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता देहू येथून पालखीचे विधिवत प्रस्थान होणार आहे. यंदाच्या पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे नव्याने तयार करण्यात आलेला भव्य चांदीचा रथ आणि प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांची उपस्थिती आहे.
त्यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन होणार असून, त्यानंतर पालखी सोहळ्याला प्रारंभ होईल. प्रस्थानानंतर पालखीचा मुक्काम इनामदार वाड्यात राहणार असून, ८ जुलै रोजी सकाळी देहू येथून पुढील मार्गासाठी पालखी प्रस्थान करणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी देहूत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
यंदाच्या वर्षी संत तुकाराम महाराजांसाठी नव्याने तयार करण्यात आलेला चांदीचा रथ हे सर्वांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या रथाच्या निर्मितीसाठी तब्बल २६० किलो चांदीचा वापर करण्यात आला असून, सुमारे १५० घनफूट सागवान लाकडापासून हा रथ तयार करण्यात आला आहे.
राजस्थानातील सिहोर येथे सागवानावर आकर्षक कोरीव नक्षीकाम करून हा रथ तयार करण्यात आला असून, त्यानंतर तो देहूत आणण्यात आला आहे. या रथाची निर्मिती राजस्थानचे प्रसिद्ध कारागीर सुरेशभाई मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. सध्या रथाचे अंतिम काम सुरू असून, ७ जुलैपूर्वी संपूर्ण काम पूर्ण होणार असल्याची माहिती देहू संस्थानने दिली आहे. पारंपरिक शैली, आकर्षक कोरीव काम आणि चांदीच्या नक्षीमुळे हा रथ वारक-यांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरणार आहे.
साडेतीन ते चार लाख वारक-यांचा सहभाग
यंदाच्या पालखी सोहळ्यात सुमारे साडेचारशे दिंड्यांचा सहभाग अपेक्षित असून, साडेतीन ते चार लाख वारकरी सहभागी होतील, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर देहू संस्थानाने दिंडी प्रमुख, वीणेकरी आणि पालखी सोहळ्यातील विविध घटकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. वारक-यांच्या आरोग्याला प्राधान्य देत संपूर्ण पालखी मार्गावर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रमुख विसाव्याच्या ठिकाणी आरोग्यसेवक, वैद्यकीय पथके आणि आवश्यक औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
‘हरित पालखी सोहळा’ हा विशेष उपक्रम
यंदा देहू संस्थानाच्या वतीने ‘हरित पालखी सोहळा’ हा विशेष उपक्रमही राबविण्यात येत आहे. या माध्यमातून प्रत्येकाने किमान एक झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे, असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश लाखो वारक-यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
वाहतूक व्यवस्थापन
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने व्यापक सुरक्षा आणि वाहतूक नियोजन केले आहे. गर्दीचे नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, पार्किंगची सुविधा आणि वारक-यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महत्त्वाच्या ठिकाणी, इंद्रायणी नदीकाठ, गाथा मंदिर परिसर तसेच प्रमुख मार्गांवर सीसीटीव्ही कॅमे-यांद्वारे २४ तास देखरेख ठेवली जाणार आहे. या बंदोबस्तासाठी सुमारे १०० अधिकारी, ७५० पोलीस कर्मचारी तसेच एसआरपीएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत.
















