हिंगोली (आय. डी. पठाण) : खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच हिंगोली जिल्ह्यात डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. हिंगोली-वाशीम रस्ता आणि गोरेगाव परिसरातील पेट्रोल पंपांवर डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या किलोमीटर लांब रांगा लावल्या आहेत. डिझेल अभावी शेतीची मशागत आणि इतर कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, वेळेत इंधन न मिळाल्यास यंदा शेतकऱ्यांची जमीन पडीक राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
पेट्रोल पंपांवर रात्री उशिरापर्यंत ट्रॅक्टरच्या रांगा
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली-वाशीम रस्त्यावरील कळगाव पाठीच्या पुढे असलेल्या भन्साळी पेट्रोल पंपावर डिझेल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी डिझेलसाठी ट्रॅक्टरच्या रांगा लावल्या. अशीच विदारक परिस्थिती गोरेगाव येथेही पाहायला मिळाली. गोरेगाव येथील संत नामदेव पेट्रोल पंपावर शेतीच्या कामासाठी डिझेल भरण्याकरिता रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल १०० ते १२५ ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संत नामदेव पेट्रोल पंपापासून ते थेट जिजामाता चौफुलीपर्यंत ट्रॅक्टरच्या रांगा पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
शेतकरी अडचणीत; यंदा शेती पडीक पडणार?
पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा वेळी शेतीची नांगरणी, कोळपणी आणि मशागतीची कामे करण्यासाठी डिझेलची अत्यंत आवश्यकता असते. मात्र, पंपांवर डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर चालक आणि शेतकरी हवालदिल झाले आहेत. “शेतीची कामे ऐन रंगात आली असताना डिझेल मिळत नाहीये. पेट्रोल पंपांवर तासन् तास उभे राहावे लागत आहे. जर डिझेल वेळेवर मिळाले नाही, तर यंदा शेतीची कामे खोळंबून जमीन पडीक पडण्याची वेळ आमच्यावर येईल.” प्रशासनाने या इंधन तुटवड्याची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
















