मुंबई : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून उष्मा वाढत असल्याने आरोग्याच्या तक्रारीमध्येही वाढ झाली आहे. खासगी व सार्वजनिक रुगालयामध्ये ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला तसेच पोटदुखी या स्वरूपाच्या तक्रारी घेऊन येणा-या रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसते. गेल्या महिन्याच्या तुलनेत या दिवसांमध्ये दहा टक्क्यांनी रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
त्वचारोगाच्या तक्रारींमध्येही पूर्वीपेक्षा अधिक वाढ झाली असून घाम तसेच उष्मा वाढल्यामुळे या तक्रारी वाढल्याचे दिसून येते. सध्या दिवसभर उष्ण आणि संध्याकाळी तसेच रात्री पुन्हा हवेमध्ये गारवा जाणवतो. त्याचाही आरोग्यावर परिणाम होताना दिसतो. या प्रकारचे वातावरण हे विषाणू संसर्गासाठी पूरक असते. या बदलामुळे सर्दी, ताप, खोकला या प्रकारच्या साथींचे आजार वाढतात. त्यामुळे या आजारावर वैद्यकीय उपचार घेणा-या रुग्णसंख्येमध्ये वाढ होते. वातावरणामध्ये होत असल्यामुळे बदलामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे, पित्त होण्यासह अंगावर पुरळ होण्याच्या तक्रारी वाढत आहेत.
‘मुलांची काळजी घ्यावी’ मोठ्याप्रमाणे मुलांमध्येही ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत आहे. मुलांना खोकल्याचा त्रास दीर्घकाळ राहत असल्याने पालकही चिंताग्रस्त झाले आहेत. कोणत्याही प्रकारचा ताप दोन दिवसांपेक्षा अधिक काळ राहिला तर अंगावर काढू नका, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच मुलांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असेल, तीव्र सर्दी-खोकला असल्यास किंवा घरातील अन्य कोणी आजारी असल्यास आजाराची तीव्रता वाढू शकते, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.