नागपूर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून दोन युवकांनी मित्राच्या दोन्ही बहिणींना पळवल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. बांधकामावर आलेल्या दोन युवकांनी त्याच्या मित्राच्या दोन्ही बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर इतर दोन सहका-यांच्या मदतीने घरी कुणी नसताना दोघींनाही मध्य प्रदेशात पळवून नेले. ही बाब भावाला माहीत होताच त्याने या प्रकरणी सीताबर्डी पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली असता, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. परंतु, गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने अवघ्या २४ तासांच्या आत या दोन्ही मुलींची सुटका करून या प्रकरणातील चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
राजू बल्लू गोस्वामी आणि देवा चेतराम गोस्वामी (२४) अशी या संशयित आरोपींची नावे आहेत, तर मोहन चेतराम गोस्वामी (२०), मोन्टी बल्लू गोस्वामी (२०) अशी इतर संशयित दोन आरोपींची नावे असून त्यांनी या कारवाईत मदत केल्याने त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील पीडित १७ आणि १९ वर्षीय तरुणी एकमेकींच्या चुलत बहिणी आहेत. त्यांचा भाऊ नागपुरातील निर्माणाधीन इमारतीवर मोलमजुरीचे काम करतो.
महिनाभरापूर्वी दोन्ही बहिणी कामाच्या शोधात भावाकडे राहायला आल्या. दरम्यान, भावाच्या सोबत काम करणारे मित्र राजू आणि देवा हे या युवतींच्या भावाच्या घरी येत होते. या दरम्यान त्यांची या दोन्ही बहिणींवर नजर गेली. त्यानंतर त्यांच्यात ओळख निर्माण होऊन दोघांनीही त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पुढे अनेक खोटी आश्वासने देत त्यांनी दोघींनाही पळवून नेले.