मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्येच निवडणूक आयोगाकडून नोटीस आल्याने उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार आहेत. ठाकरे यांनी शिवसेना फुटल्यापासून आणि पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यापासून निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडून आलेल्या नोटिसीवर जोरदार बोलण्याची शक्यता आहे. मशाल गीतामध्ये भवानी शब्द आल्याने निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे यांना नोटीस आल्याचे समजते. विरोधकांची अनेक उदाहरणे देऊन निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठा गौप्यस्फोट केला होता. या मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणीस यांनी आदित्य यांना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी दिल्लीसाठी निघणार असल्याचे सांगितले होते, असा दावा केला आहे. यानंतर भाजप नेत्यांचा चांगलाच तीळपापड झाला आहे. भाजप नेत्यांनी चौफेवर हल्ला उद्धव ठाकरे यांच्यावर चढवला आहे. त्यामुळे या वादावरही उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सुद्धा लक्ष आहे.
शिंदे गटाकडून थेट मिलिंद नार्वेकरांना विचारणा
दुसरीकडे, दक्षिण मुंबई जागेवरून शिंदे गटाकडून थेट मिलिंद नार्वेकर यांनाच विचारणा झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरेंचे स्वीय सहाय्यक असलेले आणि अत्यंत विश्वासार्ह समजले जातात तेच नार्वेकर आता ठाकरेंची साथ सोडणार का? याची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नार्वेकरांवरून सूचक विधान केल्याने राजकीय भुवया उंचावल्या गेल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट नार्वेकरांकडे चाचपणी करत आहे.