पुणे : गतवर्षी कृषि विभागाने बीटी कापूस बियाणे १ जूनला विक्री करण्याचा अध्यादेश मागे घेऊन यंदा १६ मेपासून कपाशी बियाणे विक्रीस उपलब्ध होणार असल्याने शेतक-यांची फरफट बंद होईल. कृषि विभागाने त्याकरिता मुभा दिली आहे. गतवर्षी बोंडअळीच्या धसक्याने बीटी बियाणे मान्सूनपूर्व लागवडीच्या अनुषंगाने कृषि सेवा केंद्रधारकांना १ जूनपूर्वी विक्रीस मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे लगतच्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर शेतक-यांनी बियाणे १ जूनपूर्वी खरेदी केले होते.
यात अनेक शेतक-यांची फसगत झाली. तसेच राज्यातील विक्रेत्यांनाही मोठ्या प्रमाणावर याचा फटका बसला होता.
शेतक-यांची फसवणूक होऊ नये व इतर ठिकाणाहून बियाणे खरेदीसाठी फरफट होऊ नये, हे लक्षात घेता महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड डीलर असोसिएशन (माफदा) पुणे यांनी हा मुद्दा कृषि आयुक्तालय (पुणे) यांच्याकडे लावून धरला होता. संघटनेच्या या प्रस्तावाला कृषि आयुक्तालयाने परवानगी दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे कृषि सेवा केंद्रधारकांना आता १५ मेपासून बीटी कापूस बियाणे विक्रीकरिता येणार आहे. शेतक-यांना वेळेपूर्वी बियाणे खरेदी करण्याचे नियोजन करता येणार आहे.
कृषि सेवा केंद्रात बियाणे उपलब्ध होणार असल्याने वेळेवर होणारी धावपळ थांबणार आहे. यामुळे शेतक-यांना दिलासा मिळेल व विक्रेत्यांना बियाणे विक्रीचे नियोजन करता येईल. कृषि आयुक्तांचा निर्णय चांगला आहे.