छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे एकाच हॉटेलमध्ये बुधवारी रात्री मुक्कामी होते. त्यामुळे तिघांनी एकमेकांच्या भेटी घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र तिघांनीही कोणतीही भेट न झाल्याचे म्हटले. त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला.
देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करणारे शपथपत्र तयार करून आणायला सांगितले होते, असा गौप्यस्फोट देशमुखांनी केला. तब्बल १४ महिन्यांनी मी बाहेर आलो. त्यावेळी देवेंद्र फडणीस यांनी माझ्याकडे समझौता करण्यासाठी त्यांचा माणूस पाठवला होता. त्यांनी फोन करून सांगितले की, तुम्ही मला एक शपथपत्र करुन द्या. जर ते दिले तर तुमच्यावर ईडी, सीबीआयची कारवाई होणार नाही. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना सांगितले होते की, अनिल देशमुख जन्मभर तुमच्यासोबत समझौता करणार नाही.