32.5 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रतामिळनाडूच्या धर्तीवर मराठ्यांना आरक्षण द्या

तामिळनाडूच्या धर्तीवर मराठ्यांना आरक्षण द्या

मुंबई : तामिळनाडूत जसे ६९ टक्के आरक्षण आहे, त्या धर्तीवर महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.

मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी आठवले म्हणाले, की तामिळनाडूत ओबीसीमध्ये दोन प्रकारचे आरक्षण असून एका ओबीसी गटाला ३० टक्के आणि दुस-या ओबीसी गटाला २० टक्के आरक्षण असून अनुसूचित जातीला १८ टक्के; तर आदिवासींना १ टक्का आरक्षण असे मिळून ६९ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढवून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे.

मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आंदोलनात जीव ओतला असून त्यांचा जीव महत्त्वाचा आहे; मात्र त्यासाठीच्या प्रक्रियेला त्यांनी सरकारला वेळ द्यायला हवा. जरांगे-पाटील यांनी उपोषण लवकर सोडणे आवश्यक आहे. या वेळी मराठा आंदोलकांनी संयमाने, शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन मंत्री आठवले यांनी केले.

सोबतच मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत रिपब्लिकन पक्ष शांततापूर्ण आंदोलन करणार असल्याची माहितीही या वेळी आठवले यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR