मुंबई : राज्यातल्या लोकसभेच्या दोन टप्प्यांचे मतदान पार पडले असून आता कुठे राजकीय रंग चढू लागलाय असे दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय प्रचार सभांचा मेगा शो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांमध्ये सहा सभा घेत आहेत. मराठवाड्यात प्रियंका गांधींनी सभा घेतल्या, तर उद्धव ठाकरेंनी कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रांमध्ये धडाका लावला आहे. शरद पवारांनीही बारामतीसह माढ्यात भेटीगाठींसह सभा सुरु केल्यात. तर तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनीनीही पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे.
देशातील दुस-या क्रमांकांचे सर्वाधिक लोकसभा जागा असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र. त्यामुळे भाजपच्या ४०० पार च्या ना-यासाठी महाराष्ट्र महत्त्वाचे. म्हणूनच की काय यंदा मोदींनी राज्यात सभांचा धडाका लावला आहे. ज्या मतदारसंघात भाजपला आव्हान वाटत आहे त्या मतदारसंघात भाजपने पंतप्रधान मोदींच्या सभा आयोजित केल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपकडून राज्यात एका महिन्यात मोदींच्या १६ सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी काही ठिकाणी सभा झाल्या आहेत.