न्यूयॉर्क : भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा यंदा अमेरिकेत विशेष गौरव होणार असून मॅसॅच्युसेट्सच्या गव्हर्नर मौरा हिली यांनी १५ ऑगस्ट २०२६ हा दिवस ‘भारत दिन’ म्हणून घोषित केला आहे. या घोषणेद्वारे मॅसॅच्युसेट्समधील भारतीय-अमेरिकन समुदायाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि नागरी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला आहे.
गव्हर्नर हिली यांनी १ ऑगस्टला जारी केलेल्या घोषणेत भारतीय समुदायाच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांसोबतच समाजसेवा, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि नागरी सहभाग वाढवण्यासाठी विविध भारतीय संस्था आणि कार्यकर्ते करत असलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. मॅसॅच्युसेट्सची राजधानी बोस्टनमध्येही महापौर मिशेल वू यांनी १५ ऑगस्ट हा दिवस ‘भारत दिन’ म्हणून घोषित केला आहे. बोस्टनमध्ये भारतीय समुदायाच्या वाढत्या प्रभावाची दखल घेत ही घोषणा करण्यात आली आहे.
बोस्टन शहराने यापूर्वीही भारताच्या स्वातंत्र्यदिनाची अधिकृत दखल घेतली आहे. असे वृत्त पीटीआयने दिले आहे. भारत-अमेरिका संबंधांच्या पार्श्वभूमीवर बोस्टनमध्ये यंदा आणखी एक महत्त्वाचा भारतीय संदर्भ पाहायला मिळाला. अमेरिकेच्या २५० व्या स्वातंर्त्यवर्षानिमित्त आयोजित सेल बोस्टन २५० मध्ये भारतीय नौदलाचे प्रशिक्षण जहाज आयएनएस सुदर्शिनी सहभागी झाले होते. या जहाजाने बोस्टन हार्बरमध्ये भारतीय तिरंगा फडकवत परेड ऑफ सेल्स मध्ये सहभाग घेतला. १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताच्या स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण होत आहेत. १९४७ मध्ये ब्रिटिश वसाहतवादी राजवटीतून भारत स्वतंत्र झाला. या ऐतिहासिक दिवसाने जगातील सर्वात मोठया लोकशाहीच्या प्रवासाची पायाभरणी केली, असे मॅसॅच्युसेट्सच्या घोषणेत नमूद करण्यात आले आहे. घोषणेत भारताच्या सांस्कृतिक विविधतेचाही विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
भारतीय संस्कृतीचे जगभरात दर्शन होणार
विविध धर्म, भाषा, परंपरा, रीतिरिवाज, खाद्यसंस्कृती आणि जीवनशैली असूनही भारताने एकात्मता टिकवून ठेवली आहे. ही विविधतेतील एकता भारताच्या वैशिष्टयपूर्ण ओळखीचा भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मॅसॅच्युसेट्समधील भारत-अमेरिकन समुदायाने वैद्यकशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, व्यवसाय आणि जनसेवा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या योगदानामुळे राज्याचे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जीवन अधिक समृद्ध झाले असल्याचे गव्हर्नर हिली यांच्या घोषणेत म्हटले आहे.
भारतीय वंशाचे लोकांची संख्या अधिक
अमेरिकेत राहणारे भारतीय वेगवेगळ्या पदांवर काम करत असल्याचे प्रस्तावात सांगण्यात आले आहे. यामध्ये सरकारी अधिकारी, शिपाई, कायदेशीर अधिकारी अशा अनेकांचा समावेश आहे. हे सर्व मिळून अमेरिकेचे जीवन चांगले बनविण्यात आणि येथील तत्त्वे जगासमोर नेण्यास मदत करत आहेत. हे पाहता भारताचा स्वातंत्र्यदिन अमेरिकेत राहणा-या भारतीयांसोबत साजरा करणे आवश्यक आहे. हे दोन्ही देश ज्या लोकशाही तत्त्वांच्या आधारावर जन्माला आले ते अधिक दृढपणे लागू करू शकतील.
















