33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रमहागाई, बेरोजगारी हेच निवडणुकीचे मुद्दे

महागाई, बेरोजगारी हेच निवडणुकीचे मुद्दे

मुंबई : देशासमोर आज जे प्रश्न आहेत, संविधानासमोर जे संकट आहे, हुकूमशाहीचे सावट आहे, त्यामुळे आम्ही स्वत: इंडिया आघाडीसाठी प्रसंगी दोन पावले मागे घेऊन सामोपचाराने जागावाटपाचा निर्णय घेतला. आता याप्रकरणी कार्यकर्त्यांची नाराजी असली तरी ती दूर होईल. उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसचा विजय निश्चित आहे, तर उत्तर मुंबईतील वातावरण पाहता महाविकास आघाडी तिथे विजयी होईल, असे सध्याचे चित्र आहे.

मूलभूत मुद्यांवर मुंबईतील निवडणूक लढविली जाईल. महागाई, बेरोजगारी आणि गरीब विरुद्ध भाजपचे निवडक उद्योजक आणि भांडवलशाही मानसिकता याविरोधात हा लढा असेल. जेव्हा उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणतात, झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन मिठागरांच्या जमिनीवर करणार, तेव्हा मुंबईतून गरिबांना हद्दपार करण्याची भाजपची भूमिका स्पष्ट दिसते आहे. हे मुंबईतील लोकांना पटणारे नाही, त्यामुळे भाजपचा मुंबईत निभाव लागणार नाही.

भाजप-शिंदे-अजित पवार सरकारने मुंबई महापालिकेला लुटून खाल्ले. देशातील सर्वांत श्रीमंत महापालिकेवर या सरकारने सव्वादोन लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. मुंबईतील मोक्याच्या जागा उद्योगपतींच्या घशात घालत आहेत. धारावीतील लाखो कोटींची जागा अदानी समूहाला दिली आणि इथल्या लोकांना बाहेर काढण्याचा या सरकारचा डाव आहे. नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये अच्छे दिनचे स्वप्न दाखविले, पण आता पूर्वीचे दिवस बरे होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. भाजपने दोन पक्ष फोडले. ईडीच्या भीतीने किंवा स्वार्थापोटी काही नेते गेले असतील पण कार्यकर्ता काँग्रेससोबतच आहे. त्यामुळेच राहुल गांधींच्या शिवाजी पार्कवरील रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. निवडणूक रोख्यांतून मोदींनी जगातील सर्वांत मोठा भ्रष्टाचार केला आहे. सरकारविरोधातील वातावरण पाहता मुंबई, ठाण्यातील सर्वच्या सर्व जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा आम्हाला विश्वास आहे.

अदानी समूहाला अवघ्या आठ हजार कोटींत जागा दिली. मुंबईतील अशा इतर मोक्याच्या जमिनीही निवडक उद्योगांच्या हाती दिल्या जात आहेत, हे मुंबईतील जनता खपवून घेणार नाही. भाजपला गरिबी नव्हे, तर गरिबांनाच हटवायचे आहे, त्याला आम्ही चोख उत्तर देऊ. आज महागाई वाढली आहे. २०१४ मध्ये पिठाचा भाव ३० रुपये किलो होता, तो आता ६० झाला आहे. पेट्रोल, डिझेल, डाळी, भाजीपाला सगळे महागले आहे. २०१४ मध्ये ४०० रुपयांचा असलेला गॅस सिलिंडर १,१०० रुपयांना झाला आहे. डॉलर ८३ रुपयांवर गेला आहे. महागाईमुळे आज लोकांच्या जेवणातील भाजी गायब झाली आहे. आम्ही याच मुद्यांवर निवडणूक लढवणार आहोत. महागाईचा भाजपला निश्चितच फटका बसेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR