मुंबई / रायगड : प्रतिनिधी
कोकणात पावसाचे थैमान सुरू आहे. सलग सहा दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खेड-पोलादपूर दरम्यान असलेल्या कशेडी घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे आज (६ जुलै) पहाटे चार वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड जेसीबीने हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नव्या महामार्गावर दरडीसह मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आल्याने महामार्गावरील वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्याचवेळी महामार्गावरील वाहतूक महाड-विन्हेरी मार्गावरून वळवण्यात आली आहे. मात्र, खवटी येथे दरड कोसळल्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत म्हणजे ९ तास वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून त्यांचा संताप अनावर झाला आहे.
आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटात दरड कोसळली. ही माहिती मिळताच महामार्ग पोलिस प्रशासन, खेड पोलीस, महसूल विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी समन्वय साधून तातडीने घटनास्थळी धाव घेतील आणि दरड हटवण्यासाठी जेसीबी यंत्रणा कार्यान्वित केली. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पावसाची संततधार सुरू असल्याने डोंगरकड्यांवरून दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे.
दरम्यान, रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणा-या माणगावजवळील ताम्हिणी घाटात दोन ठिकाणी दरड कोसळल्यामुळे या मार्गावरीलही वाहतूक ठप्प आहे. पुणे हद्दीत रस्ता खचला असून दोन ठिकाणी झाडे कोसळली आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. वाहतुकीसाठी ताम्हीणी घाटाचा मार्ग धोकादायक झाल्याने घटनास्थळी सुरक्षा यंत्रणांनी धाव घेतली आहे.
सुकेळी खिंडीत पाणीच पाणी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुकेळी खिंडीजवळ पाणी साचल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाहनांची कोंडी झाली असून प्रवाशांचा मनस्ताप वाढला आहे. परिणामी पाण्याचा निचरा होत नाही तोपर्यंत महामार्गावरून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
















