37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeलातूरलातूर जिल्ह्यात राबविले जाणार ‘महा रेशीम अभियान २०२४’

लातूर जिल्ह्यात राबविले जाणार ‘महा रेशीम अभियान २०२४’

लातूर : प्रतिनिधी
कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्न देणारी रेशीम शेती शेतक-यांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांना रेशीम शेतीविषयी माहिती देऊन त्यांना रेशीम शेतीसाठी प्रोत्साहित करावे तसेच सध्या रेशीम शेती होत असलेल्या परिसरात रेशीम शेतीच्या क्लस्टर निर्मितीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘महा रेशीम अभियान २०२४’ अंतर्गत रेशीम शेतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाने तयार केलेल्या रेशीम रथाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे बोलत होत्या. या कार्यक्रमाला रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके, जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट, यशदाचे प्रशिक्षक रवींद्र इंगोले, कृषी उपसंचालक महेश क्षीरसागर, जिल्हा रेशीम कार्यालयाचे विवेकानंद पेठकर, सतीश सूरकर, संतोष पवार, रोहित देशमुख, राहुल कदम, प्रगतशील शेतकरी सिध्देश्वर कागले, शौकत शेख, चॉकीधारक आकाश जाधव या वेळी उपस्थित होते.

रेशीम शेतीसाठी शासनामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सुमारे ३ लाख ९७ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. महा रेशीम अभियानाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन रेशीम शेतीविषयी शेतक-यांना माहिती द्यावी. या वर्षी रेशीम विभागासोबतच कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेमार्फत संयुक्त्तपणे रेशीम लागवडीसाठी प्रयत्त करण्यात येणार असल्याने तिनही विभागांनी समन्वयाने काम करून जिल्ह्यात जास्तीत जास्त क्षेत्र रेशीम शेतीखाली आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केल्या.

जिल्ह्यात २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत महा रेशीम अभियान राबविले जात आहे. या काळात रेशीम शेतीची माहिती देण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाने तयार केलेला रेशीम रथ पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये जाऊन शेतक-यांची सभा घेऊन त्यांना रेशीम शेतीबाबत माहिती देणार आहे. या दरम्यान रेशीम शेती करण्यास इच्छुक शेतक-यांची नोंदणीही करून घेतली जाणार
आहे. जिल्ह्यासाठी लक्षांक मर्यादित असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी २० डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन वराट यांनी या वेळी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR