मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत उमेदवारांच्या अदलाबदलीचा फॉर्म्युला राबवला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी मिशन ४५ पूर्ण करण्यासाठी महायुतीतील उमेदवार एकमेकांच्या पक्षात जाऊन त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. या फॉर्मुल्याप्रमाणे पहिल्या नावाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे या फॉर्मुल्यातील पहिले उमेदवार असतील.
या फॉर्म्युल्याप्रमाणे शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करुन शिरुरमधून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. या फॉर्म्युल्यानुसार आणखीही काही नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि महाराष्ट्रातले टार्गेट ४५ पूर्ण करण्यासाठी महायुतीतील उमेदवार एकमेकांच्या पक्षात जाऊन त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
मात्र, शिवसेनेला जागा सुटली तर मी घड्याळ का हाती घेऊ अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली. यावरूनच अमोल कोल्हेंनी आढळरावांना टोला लगावला. महायुतीला मित्रपक्षातून उमेदवार आयात करावा लागणे हीच माझ्या कामाची पोचपावती असल्याचे अमोल कोल्हेंनी म्हटले.