27.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूरलातूरची शांततेची परंपरा कायम राखून प्रशासनाला सहकार्य करा

लातूरची शांततेची परंपरा कायम राखून प्रशासनाला सहकार्य करा

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्याला शांततेची पूर्वापार परंपरा आहे. तीच परंपरा यापुढेही कायम राहावी, यासाठी मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि मराठा बांधवांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागेल, असे कृत्य कोणीही करु नये, यासाठी मराठा समाज प्रतिनिधींनी त्यांचे प्रबोधन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सोमवारी रात्री झालेल्या मराठा समाज प्रतिनिधींची बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सकल मराठा समाजाने आजवर शांततेने आंदोलन केले असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टीने यापुढेही या आंदोलनाला गालबोट लागणार नाही, यासाठी मराठा समाज प्रतिनिधींनी दक्षता घ्यावी. तसेच या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणा-यांना वेळीच बाजूला करुन त्यांचे प्रबोधन करावे. कोणीही कायदा हातात घेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले.

लातूर जिल्ह्याची परंपरा कायम शांतता आणि सौहार्दतेची राहिली आहे. ही परंपरा कायम राहावी, यासाठी मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सामंजस्याची भूमिका घेवून समाज बांधवांना मार्गदर्शन करावे. कोणत्याही स्थितीत जिल्ह्यात अनुचित घटना घडु नयेत, जिल्ह्यातील शांतता अबाधित रहावी, यासाठी मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व मराठा समाज बांधवांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. तसेच शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाला गालबोट लागू नये, सामान्य नागरिकांना त्रास होवू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच बाहेरुन येवून शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास, अशा व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR