मुंबई : प्रयागराज येथील महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १ हजारांपेक्षा जास्त आहे आणि काही मृत भाविकांची वाहने अजूनही अनेक दिवसांपासून पार्किंगमध्ये पडून आहेत. कदाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांचे प्रशासन ही वाहने लपवायला विसरले असतील असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एक्स या समाजमाध्यमावर त्यांनी पोस्ट केली आहे.
महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या उत्तर प्रदेश प्रशासनाने खोटी सांगितली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेले हे सर्वात मोठे कव्हर-अप आहे. मृत भाविकांची संख्या लपविण्यासाठी, योगी आदित्यनाथ यांनी भाविकांचा मृतदेह हिंदू रीती रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार न करता भट्टीत दहन केले आहेत असा दावा करताना प्रकाश आंबेडकरांनी या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काही प्रश्नही विचारले आहेत.
या १ हजारहून अधिक भाविकांच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात की पंतप्रधान मोदी? या मृत भाविकांच्या कुटुंबियांना तुम्ही काय उत्तर द्याल? कोणीतरी तिचा नवरा गमावला आहे, कोणीतरी तिचा भाऊ गमावला आहे तर कोणीतरी तिचा बाप गमावला आहे तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल? असा सवाल आंबेडकर यांनी केला आहे.
एखाद्याच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करणे किती महत्त्वाचे आहे, हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. योगी आदित्यनाथ यांनी खोटे बोलून आणि हिंदू विधी न पाळता त्यांचे मृतदेह भट्टीत जाळून १ हजार हून अधिक हिंदू भाविकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना फसवले असल्याचेही आंबेडकरांनी म्हटले आहे.