लातूर : विनोद उगीले
मागच्या निवडणुकीत सुधाकर शृंगारे यांच्यावर मोठा विश्वास दाखवत लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी त्यांना जवळपास अडीच लाखांच्या मताधिक्याने विजयी करत मतदारसंघातील अडीअडचणी सोडविण्यासाठी संसदेत खासदार म्हणून पाठवले खरे; परंतु लातूरच्या समस्या प्रभावीपणे संसदेत माडून त्या सोडविण्यात ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत. मागच्या ५ वर्षात लातूरकरांसाठी थेंबभर पाण्याचे नियोजन करू न शकलेले खासदार सुधाकर शृंगारे ‘मला परत संधी द्या, लातूरला पाणीदार करतो’ असे आश्वासन देत आहेत. त्यांचे हे आश्वासन पाहता तहान लागल्यावर विहीर खोदणा-या पैकीच ते आहेत असेच दिसून येते.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने सुधाकर शृंगारे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून जनतेने संसदेत पाठवले खरे; पण त्यांनी जनतेचा मोठा भ्रमनिराश केला आहे. २०१६ मध्ये उद्भवलेल्या पाणीटंचाईत रेल्वेने पाणी आल्यामुळे लातूर जगभरात पोहोचले होते. खरे तर ही बाब लक्षात ठेऊन खासदार सुधाकर शृंगारे यांनी भविष्यात लातूर जिल्ह्यावर असा प्रसंग येऊच नये यासाठी मागच्या ५ वर्षात संसदेत आवाज उठवून पाण्याचे नियोजन करायला हवे होते. ते सत्तेतील खासदार राहिल्याने त्यांच्यासाठी हा अवघड विषय नव्हता; परंतु त्यांनी या प्रश्नी मागच्या ५ वर्षात संसदेत ‘ब्र’ शब्द काढलानाही.
त्यांनी मागच्या ५ वर्षात पाण्याचे कसलेच नियोजन न करता ‘हर घर जल अभियान’ राबविल्याचे सांगतात; पण प्रत्यक्षात रस्ते खोदून कोरडी पाईपलाईन पुरण्याचे व यातून ठेकेदाराचे घर भरण्याचे काम झाले असून तसे आरोप ही त्याच्यावर विरोधकांतून होत आहेत.
असे असताना आता ते परत मला संधी द्या. मी पुढील ५ वर्षात ‘लातूरला पाणीदार करतो’ अशा भूलथापा मारत आहेत. परत संधी द्या, लातूरला पाणीदार करतो म्हणजे ते तहान लागल्यावर विहीर खोदणा-यापैकीच एक आहेत असेच काहीसे दिसून येत आहे.
खासदार होण्याअगोदरच रेल्वे बोगी कारखान्यास मंजुरी
खासदार सुधाकर शृंगारे आपल्यामुळे रेल्वे बोगी कारखाना मंजूर झाला असून आपण या कारखान्यात मतदारसंघातील ७५ टक्के लोकांना या कारखान्यात रोजगार उपलब्ध करून देऊ, असे जाहीर सभेत घोषित करतात; पण त्यांना हा कारखाना ते खासदार होण्या अगोदरच मंजूर झाला. या कारखान्यात मागच्या ५ वर्षात स्थानिकच्या एकाही नागरिकाला रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो नाही, याचेच भान त्यांना नाही हे मात्र खरे आहे तसे नागरिकांतून बोलले ही जात आहे.
प्रवाशांच्या प्रतिसादामुळेच लातूर रेल्वे स्थानकावर पीटलाईन
एकेकाळी रेल्वेपासून वंचित असलेल्या लातूरकरांना स्व. विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नांमुळेच लातूरला रेल्व येऊ शकली हे सर्वश्रुत आहे. लातूरला रेल्वे आल्यापासूनच रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून अनेक नवीन रेल्वे या मार्गावर सुरू झाल्या; परंतु प्रवाशांचा प्रतिसाद व स्थानकावरील गैरसोयी तसेच येथे पीटलाईन नसल्याने सोलापूर-बीदर-कुर्डुवाडी येथे अतिरिक्त रेल्वेंना माराव्या लागत असलेल्या रेल्वे फे-या यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद व पीटलाईनची आवश्यकता पाहून येथे पीटलाईन मंजूर केली आहे.