मालेगाव – विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मालेगाव तालुक्यातील झोडगे गावात घडली. पिण्याच्या पाण्यासाठी दोघींचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
निताबाई जाधव (वय ४७) व इच्छामणी जाधव (वय १६) अशी मृत आई व मुलीची नावे आहेत.
गुरुवारी दुपारी या दोघी मायलेकी गावाजवळ असलेल्या एका विहिरीवर पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. त्या पोह-याने पाणी बाहेर काढत असताना अचानक विहिरीत पडल्या. सायंकाळी या विहिरीवर आलेल्या एका पशुपालकाला या दोघींचे मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले. त्यानंतर त्याने ही माहिती गावक-यांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव स्थित सामान्य रुग्णालयात पाठवले. रात्री उशिरा मायलेकींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पिण्याच्या पाण्यासाठी दोघी मायलेकीचा बळी गेल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.