22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयमहात्मा गांधींना जगात ओळखण्यासाठी काहीही केले नाही

महात्मा गांधींना जगात ओळखण्यासाठी काहीही केले नाही

पंतप्रधान मोदींचे वक्तव्य वक्तव्याची सर्वत्र चर्चा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी पक्ष, विरोधक आणि देशासंबंधीच्या अनेक मुद्यांवर भाष्य केले. पंतप्रधान मोदींनी यावेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दलच्या त्यांच्या वैयक्तिक भावना उघड केल्या. विरोधकांमध्ये तुम्हाला कोणता नेता आवडतो असे विचारले असता, पंतप्रधानांनी मुत्सद्दी भूमिका कायम ठेवली आणि नाव सांगण्यास नकार दिला. पण नेत्यांसोबत असलेल्या सौहार्दपूर्ण संबंधांची कबुली दिली. यावेळी मोदींनी अनेकदा सोनिया गांधींच्या आरोग्याच्या प्रश्नादरम्यान पाठिंबा देण्यासारख्या उदाहरणांचाही उल्लेख केला. यासोबत पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे.

महात्मा गांधी यांच्यावर जेव्हा चित्रपट बनला तेव्हा जगभरात त्यांच्याबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये केले आहे. महात्मा गांधींचे विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आपण ७५ वर्षांत काहीही केले नाही, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. मोदींच्या या वक्तव्याची आता सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. १९ व्या दशकातील कायदे मला २१ व्या दशकात बदलावे लागत आहेत. हे आधीच व्हायला हवे होते. आता प्रश्न फक्त आपल्या तीर्थक्षेत्रांचा नाही.

महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्त्व होते. पण गेल्या ७५ वर्षात महात्मा गांधी यांना जगाने ओळखावं ही आपली जबाबदारी नव्हती का? मला माफ करा पण त्यांना कोणीही ओळखत नाही. पहिल्यांदा महात्मा गांधी चित्रपट तयार झाला तेव्हा जगभरात गांधी कोण आहेत? याबाबत कुतूहल निर्माण झाले. आपण हे केले नाही. हे देशाचे काम होते. जर मार्टिन ल्यूथर किंग यांना जग ओळखते. नेन्सन मंडेला यांना ओळखले जाते. मात्र, महात्मा गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. मी संपूर्ण जग फिरलो आहे. मात्र, गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. आज जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात आहे. आपण खूप काही गमावले आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

रोहित पवारांची टीका
नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीटच्या माध्यमातून टीका केली आहे. गांधी विचार म्हणून ज्यांचे विचार जगभर अजरामर आहेत, ज्यांनी जगाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि सर्वधर्मसमभावाचा विचार आणि उपोषण व सत्याग्रहाचे अस्त्र दिले, ज्यांचे आदर्श म्हणून जगभर पुतळे उभारले गेले त्या महात्मा गांधीजींना जगात कुणी ओळखत नव्हते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य साफ चुकीचे आहे. ही टेलिप्रॉम्प्टरची चूक आहे की वैचारिक दारिद्रय असलेल्या अधिका-यांकडून घेतलेल्या ब्रीफची, हे कळत नाही. तसे असेल तर अशा अधिका-यांना मोदी साहेबांनी तातडीने दूर केले पाहीजे. जेणेकरुन चुकीच्या वक्तव्यामुळे पंतप्रधानपदाची गरीमा कमी होणार नाही आणि राष्ट्रपुरुषाबाबत चुकीची माहितीही प्रसारीत होणार नाही. शिवाय गांधी हा विचार असल्याने त्याला भाजपप्रमाणे मार्केटिंगची गरज नसते. हा विचार लोक स्वत:हूनच स्वीकारत असतात असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR