मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्याच कार्यकाळात घेण्यात आला होता. पण आमच्या नावावर तो खपवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा दावा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यावेळचे मंत्रिमंडळ बैठकीत झालेले निर्णय, त्यावरील नोटिंग, समित्यांचे अहवालच विधानसभेत सादर केले. पण किमान या निर्णयामुळे दोघे ठाकरे बंधू तरी एकत्र आले. निर्णय उद्धव ठाकरेंचा होता पण ठाकरे बंधूंना एकत्र आणायचे श्रेय माझे असल्याची चौफेर टोलेबाजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला आज सविस्तर उत्तर दिले. आपल्या उत्तराच्या भाषणात फडणवीस यांनी विरोधी पक्षाचे आरोप खोडून काढताना अनेकांच्या टोप्या उडवल्या. हिंदी सक्तीच्या विषयावर खुलासा करताना फडणवीस म्हणाले, हिंदी सक्तीचा विषय उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच घेण्यात आला. त्याबाबतच्या अहवालावर, मंत्रिमंडळ बैठकीच्या इतिवृत्तावर उद्धव ठाकरेंची सही असल्याचे सांगत त्यांनी सभागृहात कागदपत्रेही दाखवली. त्यावेळच्या समितीत उद्धव ठाकरे गटाचे उपनेते विजय कदम यांचाही समावेश होता अशी माहितीही त्यांनी दिली.
हिंदी विषयाच्या संदर्भात समिती यांनी नेमली आणि निर्णयही घेतला. पण ओरड आमच्या नावाने करण्यात आली. नंतर आमचे राजसाहेबही यांच्यासोबत गेले असे सांगताना फडणवीस यांनी यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीत कुणाकुणाचा समावेश होता याची सविस्तर माहिती फडणवीस यांनी दिली. या समितीच्या आधारे शासन निर्णय जारी करण्यात आल्याचे स्पष्ट करताना फडणवीस यांनी तुम्ही हिंदी सक्ती केली असली तरी आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात मराठीच सक्तीची राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

