मुंबई : महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेला लागून असलेल्या १४ गावांतील सुमारे ४ हजार मतदारांना दोन्ही राज्यांमध्ये मतदानाचा हक्क आहे. यासोबतच दोन्ही राज्यातील सुख-सुविधांचा लाभही येथील नागरिक घेतात. महाराष्ट्रातील चंद्रपूर मतदारसंघात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे तेलंगणातील आदिलाबाद मतदारसंघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. या दोनही टप्प्यात या १४ गावातील नागरिकांना मतदान करता येणार आहे.
महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून १९५६ पासून सीमावाद सुरू असल्यामुळे, दोन्ही राज्यांनी दुर्गम भागात राहणा-या ६ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या १४ गावांमध्ये प्रशासकीय कार्यालये स्थापन केली आहेत.
ही वादग्रस्त १४ गावे ३० किमीच्या परिघात येतात. या गावांना पाणी, शिधापत्रिका, वीज आदी सुविधा दोन्ही राज्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. या १४ गावातील गावक-यांकडे दोन्ही राज्यातील मतदार ओळखपत्रे आहेत.