सोलापूर : आषाढी वारीत येत असलेल्या लाखो भाविकांच्या संख्येत महिला भाविकांची संख्या सर्वाधिक असते. महिलांची संख्या लक्षात घेता त्याच्या सुरक्षेला व आरोग्याला जास्त प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने हिरकणी कक्ष, महिलांसाठी विशेष बेड, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग, डिस्पोजर मशीन, लाईट, पंखे, खुर्ची, स्वच्छ पिण्याचे पाणी, कमरापेटी, स्तनदा मातांसाठी गोपनीय कक्ष निर्माण करण्यात येत आहेत.
आषाढी यात्रेच्या निमित्ताने ५ जुलै २०२५ रोजी पालखीचे आगमन जिल्ह्यात होणार आहे. ६ जुलै रोजी आषाढी यात्रा साजरी होणार आहे. पालखी मार्गावर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत, कृषी, आरोग्य, बांधकाम, पाणी व स्वच्छता विभाग, शिक्षण आदी विविध विभागाच्यावतीने विविध सेवासुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत वारीतील प्रत्येक भाविकांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. शुद्ध पाणीपुरवठा, सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
पंढरपूरच्या वारीत चेंगराचेंगरी होईल अशी बारा ठिकाणे शासनाकडून निश्चित करण्यात आली आहेत. या प्रत्येक ठिकाणी २२ पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे. गर्दीवरील नियंत्रणासाठी २५० विशेष पोलिस अधिका-यांचे पथक २४ तास कार्यरत असणार आहे. पावसात भाविकांना त्रास होऊ नये यासाठी वॉटरप्रूफ मंडप उभारणी करण्यात येत आहे.
शासकीय यंत्रणेचे समन्वय असलेले नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून, वारीच्या काळात दूरध्वनी संपर्कासाठी कर्मचा-यांना १०० वायरलेस फोन देण्यात आले आहेत.प्रत्येक ठिकाणी नि:शुल्क दूरध्वनी सुविधा देण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. पालखी मार्गाची लांबी १२० किलोमीटर आहे. सीईओ कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, अमोल जाधव, प्रसाद मिरकले, संजय धनशेट्टी, डॉ. संतोष नवले आदी विभागप्रमुख व अन्य कर्मचारी पालखी मार्गावरील सेवासुविधा वेळेत व तत्पर पोहोचविण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत.