मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत मतदारांनी १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावा असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने गुरुवारी केले. भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार गणना अर्ज भरून स्वाक्षरी केलेल्या मतदारांची नावे २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणा-या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोणत्याही व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नोंदवता येत नाही. त्यामुळे ज्या मतदारांची नावे एकाहून अधिक ठिकाणी असतील त्यांनी सध्याच्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणासाठीच गणना अर्ज भरावा. इतर ठिकाणच्या अर्जावर आधीच नोंदणीकृत अशी नोंद करून त्या ठिकाणी नाव समाविष्ट केले जाणार नाही असे मुख्य अधिका-यांनी म्हटले आहे. दरम्यान, प्रारूप मतदार यादीत पात्र असूनही नाव नसलेल्या किंवा नव्याने मतदार म्हणून नोंदणी करू इच्छिणा-या नागरिकांना २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना क्र. ६ भरून नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्याचप्रमाणे नोंदीतील दुरुस्तीसाठी नमुना क्र. ८ आणि नाव वगळण्यासाठी नमुना क्र. ७ सादर करता येणार आहे.
सर्व हरकती आणि दावे निकाली काढल्यानंतर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही कायद्यातील तरतुदींनुसार मतदार यादीतील नोंदींचे सतत अद्ययावतीकरण सुरू राहणार असल्याची माहितीही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
















