मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए आघाडीत सामील होणार आणि जयंत पाटील यांना राज्याचे अर्थमंत्रीपद मिळणार, अशा चर्चांनी जोर धरला आहे. त्या अनुषंगाने जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने या चर्चेला आणखीनच बळकटी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाष्य केले.
एकनाथ शिंदे आणि जयंत पाटील यांच्या भेटीमागे कोणतेही वेगळे राजकीय समीकरण असेल, असे वाटत नाही. जयंतराव हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मुरब्बी राजकारणी आहेत. ते सातवेळा विधिमंडळातून निवडून आले आहेत. त्यांनी दीर्घकाळ राज्याचे नेतृत्व केले आहे. ते मुख्यमंर्त्यांना वेगळ्या कारणासाठी भेटू शकतात. मला या भेटीत काही वावगे वाटत नाही. शरद पवार हे गेली अनेक वर्षे राज्य आणि केंद्रातील राजकारणाचा प्रमुख घटक राहिले आहेत. त्यांचा पक्षही राष्ट्रीय स्तरावर आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या पक्षाला त्यांच्या पद्धतीने वाटचाल करण्याचा आणि कोणासोबत जायचे हा निर्णय घ्यायचा अधिकार असल्याचे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी सुनील तटकरे यांनी जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनुषंगाने घडत असलेल्या राजकीय घडामोडींविषयी सविस्तर भाष्य केले. एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते मिळू नये, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी ते अमित शाह यांना भेटल्याची चर्चा आहे. यावर आपले मत काय असा प्रश्न सुनील तटकरे यांना विचारला असता त्यांनी म्हटले की, मला स्वत:ला वाटते की, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्रीपद उत्तम पद्धतीने भुषविले आहे. ते इतर पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये, असे बोलतील हे मला स्वत:ला वाटत नाही. एकनाथ शिंदे हे त्यांच्या पद्धतीने राजकारण करणारे नेते आहेत. मित्रपक्षाला काय मिळावं, मिळू नये, असे ते मला बोलल्याचं गेल्या तीन वर्षांमध्ये मला कधी जाणवले नाही. ते जे पाऊल उचलतात, त्याला यश मिळते. ते त्यांचे कर्तृत्व त्या पद्धतीने दाखवतात. राष्ट्रवादीशी सौहार्दाचे संबंध आहेत असे सुनील तटकरे यांनी म्हटले.
यावेळी सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्थखात्यावरील दावा पुन्हा एकदा सांगितला. अर्थखाते राष्ट्रवादीला मिळावे, ही आमची मागणी आहे. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही यासंदर्भात लवकरच मुख्यमंर्त्यांना भेटणार आहोत. ती भेट झाल्यावर आम्हाला इतर बाबींवरही चर्चा करायची आहे, असे सुनील तटकरे यांनी म्हटले. पवार साहेबांच्या पक्षातील सहका-यांच्या सत्तेतील सहभागाच्या चर्चा आहेत. पण मला याबाबत माहिती नाही. शेवटी सहा दशकं केंद्र आणि राज्याच्या राजकारणात पवार साहेबांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यांच्या पक्षाला त्यांच्या पद्धतीने वाटचाल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या पक्षाने कोणासोबत जावे, हा त्यांचा प्रश्न आहे असेही सुनील तटकरे यांनी म्हटले.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ
सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेवून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. यानंतर बुधवारी रात्री पार्थ पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत इथून पुढे घटकपक्षातील कोणत्याही नेत्याची भेट घेताना सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना कळवले जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. याबाबत सुनील तटकरे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी म्हटले की, पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत ते संसदेतील खासदार आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांना भेटू शकतात. त्यामध्ये वावगं वाटण्याचं कारण नाही. ते प्रशासकीय कामासोबत संघटनेच्या कामाची चर्चा करत असले तरी वेगळे वाटण्याचे कारण नाही असेही सुनील तटकरे यांनी म्हटले.
















