विशेष प्रतिनिधी : NEET-UG 2026 वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा पेपर नेमका कसा लीक झाला आणि तो कसा पकडला गेला, याचा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा या प्रकरणाचे व्हिसलब्लोअर (मुख्य साक्षीदार) आणि केमिस्ट्रीचे शिक्षक शशिकांत सुथार यांनी केला आहे. ३ मे रोजी परीक्षा संपल्यानंतर अवघ्या काही तासांतच हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला होता. एका व्हायरल पीडीएफमधील प्रश्नांचा परीक्षेच्या मूळ पेपरशी अचूक ताळमेळ लागल्याने हा पेपर लीक झाल्याचे उघड झाले.
परीक्षा संपली अन् ‘त्या’ पीडीएफने धक्का दिला
शशिकांत सुथार यांनी सांगितले की, ३ मे रोजी नीटची परीक्षा संपल्यानंतर मी नेहमीप्रमाणे माझ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर सोडवत होतो आणि त्यांच्या शंकांचे निरसन करत होतो. त्याच वेळी माझी एका ओळखीच्या व्यक्तीशी भेट झाली. त्या व्यक्तीने मला मोबाईलवर एक पीडीएफ (PDF) फाईल दाखवली, ज्यामध्ये केमिस्ट्रीचे काही प्रश्न होते. जेव्हा मी त्या पीडीएफमधील ४५ प्रश्नांची तुलना नीटच्या (NEET-UG) मूळ प्रश्नपत्रिकेशी केली, तेव्हा मला प्रचंड मोठा धक्का बसला. पीडीएफमध्ये असलेले सर्वच्या सर्व ४५ प्रश्न मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आले होते. एकही प्रश्न इकडेतिकडे झाला नव्हता.
बायोलॉजीचे ९० प्रश्नही हुबेहूब मॅच
केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये झालेला हा मोठा फेरफार पाहून शशिकांत सुथार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी तातडीने बायोलॉजीच्या (जीवशास्त्र) पेपरची तपासणी करण्याचे ठरवले. त्यांनी एका बायोलॉजी शिक्षकाची मदत घेतली आणि दुसऱ्या पीडीएफमधील ९० प्रश्नांचा ताळमेळ मुख्य प्रश्नपत्रिकेशी लावला. त्या तपासणीतही धक्कादायक वास्तव समोर आले. बायोलॉजीच्या पेपरमधील ९० पैकी ९० प्रश्न त्या पीडीएफमधील प्रश्नांशी हुबेहूब मॅच झाले. म्हणजेच केमिस्ट्रीचे ४५ आणि बायोलॉजीचे ९० मिळून तब्बल १३५ प्रश्न आधीच लीक झालेल्या पीडीएफमध्ये उपलब्ध होते.
एनटीएने घेतली तात्काळ दखल; सीबीआय, एसओजी मैदानात
हा सर्व ठोस पुरावा हाती लागल्यानंतर शशिकांत सुथार यांनी अजिबात वेळ न घालवता थेट राष्ट्रीय परीक्षा एजन्सीशी (NTA) संपर्क साधला. त्यांनी एनटीएला या संपूर्ण घोटाळ्याचे सविस्तर तपशील आणि डिजिटल पुरावे ईमेलद्वारे पाठवले. या गंभीर प्रकरणाची एनटीएने अत्यंत वेगाने दखल घेतली. पुढील तपासासाठी केंद्र सरकारने तात्काळ केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि राजस्थान पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपला (SOG) पाचारण केले. दिल्लीहून सीबीआयचे विशेष पथक तपासासाठी दाखल झाले आणि त्यांनी सुथार यांच्याकडून सर्व प्रत्यक्ष पुरावे ताब्यात घेतले. या ठोस पुराव्यांमुळेच सरकारला नीट परीक्षा रद्द करून २१ जून २०२६ रोजी पुन्हा परीक्षा घेण्याचा मोठा निर्णय घ्यावा लागला.
















